ताज्या घडामोडीमुंबई

फडणवीसांनी जाहीर केलेला ‘हिंदुहृदयसम्राट’ बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग खुला करणार

मुंबई | महाराष्ट्राची ओळख आतापर्यंत सुपरफास्ट मुंबई ते पुणे या एक्स्प्रेस वेमुळे होती. या द्रुतगती मार्गाने दोन महानगरांना जवळ आणलं आणि दळणवळण, रोजगार, सोयीसुविधा सगळं काही सोपं केलं. आता महाराष्ट्र पुन्हा एकदा अशाच एका अद्भुत प्रकल्पाचा साक्षीदार होण्यासाठी सज्ज होतोय, ज्याचं नाव आहे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग.. देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेल्या या मार्गाचा पहिला टप्पा ठाकरे सरकारच्या काळात पूर्ण होतोय.

देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आज सर्वात मोठी सल कशाची असेल तर त्यांनी जाहीर केलेल्या एका अशा प्रकल्पाचं उद्घाटन लवकरच होतंय, जो प्रकल्प महाराष्ट्रात नव्हे, देशाच्या वैभवात भर घालणार आहे आणि याचं लोकार्पण करताना फडणवीस स्वतः मुख्यमंत्री पदावर नाहीत. मुंबई आणि नागपूरला जवळ आणणारा समृद्धी हा फक्त एक मार्ग नाही, तर या महामार्गाच्या निमित्ताने महाराष्ट्रात एक असं वैभव तयार होतंय, जे सध्या कुठेही नाही. याची किंमत आहे तब्बल ४६ हजार कोटी रुपये. दोन शहरांना एकत्र आणणारा हा महामार्ग मराठवाड्याच्या राजधानीलाही जोडला गेलाय.

या जिल्ह्यांचा महामार्गात समावेश

नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक, ठाणे

या दहा जिल्ह्यांतून समृद्धी महामार्ग जातो. याशिवाय चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड या १४ जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे या महामार्गाशी महाराष्ट्रातील एकूण २४ जिल्हे जोडले जातील.

२६ तालुके आणि ३९२ गावांमधून हा मार्ग जातो. या महामार्गावर वाहनांची गती मर्यादा १५० किलोमीटर आहे. मुंबईहून तुम्हाला औरंगाबादला येण्यासाठी फक्त चार तास लागतील, तर इथून पुढे नागपूरला पोहोचण्यासाठीही चार तास लागतील. म्हणजेच ७०१ किलोमीटरच्या या मार्गावरुन तुम्ही मुंबईहून नागपूरला फक्त आठ तासात जाऊ शकता. लवकर पोहोचणं तर शक्य होणार आहेच, पण तुम्हाला टोलही तसाच मोजावा लागेल हेही तेवढंच खरंय.

भरघोस टोल द्यावा लागणार

समृद्धी महामार्गाच्या ७०१ किलोमीटर रस्त्यावर २६ टोल नाके राहणार आहेत. या २६ ठिकाणी टोल वसुली करण्यासाठी ऑपरेटर नियुक्त केले जातील. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. हे टोलचे टेंडर तीन वर्षांसाठी दिलं जाईल. ७०१ किलोमीटरवरील रस्त्यावर २६ टोल स्टेशनवर २ हजार ६२४ कर्मचारी राहतील. कार, जीप, व्हॅन किंवा हलक्या वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर १.७३ रुपये टोल आकारला जाईल. नागपूर ते मुंबई असा कारने प्रवास केला तर या महामार्गावर एक हजार २१३ रुपये टोल द्यावा लागेल. चांगला रस्ता पाहिजे म्हटलं तर त्यासाठी पैसेही मोजावे लागतात असं गडकरी नेहमी म्हणतात. तसंच या समृद्धी महामार्गावरही २६ ठिकाणी टोल वसुली होईल आणि सुस्साट प्रवासासाठी भरमसाठ पैसाही मोजावा लागणार आहे.

समृद्धी महामार्गाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देशात पहिल्यांदाच वन्य प्राण्यांसाठी एखाद्या महामार्गावर नऊ ग्रीन ब्रिज आणि १७ अंडरपास बनवण्यात आलेत, ज्यामुळे वन्य प्राण्यांना हालचालींमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. रस्त्यावरच हेलिपॅडही तयार आहेत. या मार्गाचं सौंदर्यही पाहण्यासारखं आहे. समृद्धी महामार्ग हा एक चमत्कार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार झालेलं काम, वन्य प्राण्यांची घेण्यात आलेली काळजी, वाहनधारकांसाठी करण्यात आलेला विचार, प्रवासाचा कमी होणारा वेग हे सगळं काही अद्भुत आहे.

आंतरराष्ट्रीय मानकांनुसार काम

समृद्धी महामार्ग एकूण आठ पदरी म्हणजे प्रत्येक बाजूला चार लेन आहेत. एवढंच नाही, तर भविष्यात लेन वाढवण्याची गरज पडली तरीही दोन्ही बाजूंच्या मध्ये जागा सोडण्यात आलीय, ज्यामुळे पुन्हा भूसंपादन करण्याचीही गरज पडणार नाही. हा महामार्ग महत्त्वाच्या औद्योगिक वसाहतींसह दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कोरिडॉर, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कोरिडॉर, वर्धा आणि जालन्याचं ड्राय पोर्ट आणि मुंबईतील जेएनपीटी अशी सर्व प्रमुख केंद्र जोडणार आहे. शिर्डी ते मुंबई हे बाकी असलेलं कामही लवकरच पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. पण यापैकी शिर्डी ते नागपूर हा रस्ता किती सुस्साट आणि किती वैभवशाली आहे हे आपण पाहिलं. लवकरच हा रस्ता वाहनधारकांच्या सेवेत येईल आणि महाराष्ट्राच्या दळणवळणाला, रोजगाराला आणि २४ जिल्ह्यांच्या प्रगतीला बळकट करणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button