‘घरात एवढा पैसा झाल्यावर रस्त्यावर..’; पुणे अपघात प्रकरणावर बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया
पुणे | पुण्यातील कल्याणीनगर परिसरात आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवून एका अल्पवयीन मुलाने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. या घटनेवर आता प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे.
बच्चू कडू म्हणाले की, घरात एवढा पैसा झाल्यावर रस्त्यावर अशी मस्ती येते. पैशामुळे असे लोभी लोक माणुसकी विसरत चालले आहेत. अशा अपघातामध्ये काही बदल होणं, अशा प्रकारे बेदरकारपणे कार चावलणं चुकीचं आहे. डान्सबार आणि पबमध्ये जाणारा वर्ग बघितला तर हा प्रचंड पैसा असणारा वर्ग आहे. शौकीन लोक हे पैशाच्या माध्यमातून माणुसकी विसरलेले लोक आहेत. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात.
हेही वाचा – शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा
या सर्व गोष्टीवर बंधन येईल का? असा प्रश्न विचारला असते ते म्हणाले की, कसं बधन येईल? कारण अधिकारी आणि नेत्यांना काही पडलेलं नाही. धर्म जाती आणि पैशाच्या ताकदीवर जर लोकशाही झुकवली जात असेल, मत खेचून घेण्याचा प्रयत्न केला जात असेल तर सामान्य माणसांच्या जीवनाला आणि मरणाला काय अर्थ आहे? ज्याची मेहनत कमी त्यांना पगार जास्त आणि ज्याचे श्रम जास्त त्याला पगार कमी अशी येथील परिस्थिती आहे, असही बच्चू कडू म्हणाले.