‘एकनाथ शिंदेना हटवल्यास भाजपला परिणाम भोगावे लागतील’; बच्चू कडू यांचा इशारा
मुंबई : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर एका आठवड्याच्या आत सुनावणी सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. तर भाजपाने प्लॅन बी तयार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, यावरून प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदेना हटवल्यास भाजपला परिणाम भोगावे लागतील, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
अजित पवार मुख्यमंत्री होणार? असा प्रश्न विचारला असता बच्चू कडू म्हणाले, असे होऊ शकत नाही. तसे झाल्यास मोठ्या प्रमाणावर भाजपला परिणाम भोगावे लागतील. एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचे ५ ते १० टक्के मतदार नाराज होतील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भाजपचे काही प्लॅन कामी येणार नाही.
हेही वाचा – ‘मला अजितदादांसारखं व्हायचं नाही’; रोहित पवार यांचं अजित पवार गटाला प्रत्युत्तर
आताच ज्या काही गडबडी झाल्या, त्यामुळे नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. जर एकनाथ शिंदे यांन बाहेर काढले, तर नाराजी वाढणार आहे. नाराजीच्या सुराची टक्केवारी वाढली, तर तुमचे कोणतेही प्लॅन कामी येणार नाहीत, लोक त्यांचे प्लॅन सुरू करतील. मग, लोकच कोणता पक्ष ठेवायचा, हे ठरवतील, असं बच्चू कडू म्हणाले.
सरकारने एकदा आरक्षणाचा मुद्दा संपवला पाहिजे. आरक्षण विषय हा राजकीय लोकांनी केलेली व्यवस्था आहे. विकासाची व्यवस्था निर्माण होऊ शकली नाही.त्यामुळे विकासावर मते मिळू शकले नाहीत. आता निवडणुकीत आरक्षणावर मते मागितली जाणार. जातीचे मुद्दे घेऊन मते मागणार, असं बच्चू कडू म्हणाले.