पीक विम्याच्या परताव्यासाठी उच्च न्यायालयात दाद
- ३० ऑगस्ट रोजी मुख्य न्यायाधीशांसमोर सुनावणी
मनमाड |
नांदगाव तालुक्यातील शेतक ऱ्यांना प्रलंबित पीक विमा परतावा मिळण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याची सुनावणी ३० ऑगस्ट रोजी मुख्य न्यायाधीशांसमोर होणार आहे. या जनहित याचिकेवरील निकालाचा लाभ राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना होणार आहे. आ. सुहास कांदे यांनी ही याचिका दाखल केली. एखाद्या लोकप्रतिनिधीने पीक विमा योजनेबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे. ही याचिका केंद्र किंवा राज्य सरकार विरोधात नाही तर पीक विमा कंपनीच्या विरोधात आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघात ७१ हजार, नांदगाव तालुक्यात ४१ हजार शेतकरी २०० कोटी रुपयांच्या पीक विमा योजनेच्या रकमेपासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आपण लढा देत असून विम्याची ही रक्कम मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे कांदे यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. अतिवृष्टी, पाऊस यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून २०२०-२१ मध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता.
शेती पिकांचे नुकसान होऊनदेखील अद्याप विम्याचा परतावा मिळालेला नाही. शेतकरी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट यांसारख्या नैसर्गिक संकटांचा सामना करीत हतबल झाला आहे. नैसर्गिक संकटामुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. ही योजना केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन आणि पीक विमा कंपनी असे तिघे मिळून राबवतात. या योजनेप्रमाणे सन २०२०-२१ मध्ये शेतऱ्यांनी विम्याचा हप्ता भरला होता. पिकांचे नुकसान होऊनही भरपाई मिळाली नाही. त्याबाबत केंद्र आणि राज्य सरकार आणि पीक विमा कंपनी यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. परंतु भारती एक्स जनरल या संबंधित विमा कंपनीने दुर्लक्ष केल्याची तक्रार कांदे यांनी केली. उच्च न्यायालयात याचिकेवर १२ ऑगस्ट रोजी प्रथम सुनावणी झाली. त्यावेळी राज्य व केंद्र सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र विमा कंपनीचे प्रतिनिधी गैरहजर होते. उच्च न्यायालयाने संबंधितांना नोटीस बजावत ३० ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे, असे याचिकाकर्ते आ. कांदे यांनी सांगितले.
- दीड वर्षांपासून वंचित
नांदगावमधून ४१ हजार ५८५ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. त्यापोटी एक कोटी ९८ लाख ६४ हजार ७८५ इतका हप्ता भरला आहे. त्यापैकी नांदगाव मतदारसंघात समाविष्ट असलेल्या गावांमधील जवळपास हजार शेतकऱ्यांना सुमारे २०० कोटी रुपयांचा पीक विमा परतावा मिळालेला नाही, अशी माहिती आ. कांदे यांनी दिली. शेतकरी हक्काच्या पीक विम्याचा परतावा मिळण्यापासून दीड वर्षांपासून वंचित आहे.