‘ही सैतानी साम्राज्याची सुरूवात’; अमोल मिटकरींचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल!
मुंबई : खारपाणपट्ट्यातील ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेची मान्यता शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोला ते नागपूर पायी संघर्ष यात्रा काढली. नितीन देशमुख यांना नागपूरच्या वेशीवर ताब्यात घेतलं आहे. देशमुखांवरील कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार अमोल मिटकरींनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
जेव्हापासून शिंदे फडणवीस सरकार हे अस्तित्वात आले तेव्हापासून लोकशाही संपली आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाला आहे. याच जितंजागतं उदाहरण आज अकोला ते नागपूरपर्यंत पाण्यासाठी संघर्ष यात्रा काढणारे नितीन देशमुख यांना ज्या पद्धतीने पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केली, त्यावरून पाहायला मिळालं आहे. त्यामुळे हा सैतानी राज्याचा उदय आहे, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
नेमका काय आहे प्रकरण?
महाविकास आघाडीचे सरकार असताना खारपाणपट्ट्यात येणाऱ्या बाळापूर तालुक्यातील ६९ गावांना गोड्या पाण्याचा पुरवठा होण्यासाठी पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली होती. त्याचे कामही सुरू झाले होते. त्यासाठी वान धरणातील पाणी ६९ गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी आरक्षित करण्यात आलं. पण, याला तेल्हारा तालुक्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर स्थानिक भाजपा लोकप्रतिनिधींनी ही योजना रद्द करण्यासाठी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला.
फडणवीसांनीही या पाणी पुरवठा योजना रद्द केली. यावरून आता नितीन देशमुख आक्रमक झाले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने ही बंदी उठवावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. पण त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.