‘महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर रिक्षा’; अमित शाह यांची खोचक टीका
Amit Shah | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज जळगाव दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी त्यांनी युवकांना संबोधित केलं. २०४७ च्या विकसनशील भारतासाठी मोदींना निवडून द्या असं आवाहनही त्यांनी आज उपस्थितांना केलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातली महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर रिक्षा असल्याचं ते म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, मी आपल्याशी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करायला आलो आहे. तरुण मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की, उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ही निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी ही निवडणूक आहे. पण या गैरसमजात राहू नका. येणारी निवडणूक ही २०४७ मध्ये आत्मनिर्भर आणि विकसित भारत बनवण्यासाठी आहे. २०४७ मध्ये मंचावर खूप कमी लोकं असतील, पण मंचासमोर बसलेले सर्व तरुण सहकारी असतील. ही निवडणूक आपल्यासाठी आहे. ही निवडणूक भारताच्या तरुणांची आणि भारताच्या भविष्यासाठी आहे. भाजपला मत म्हणजे तरुणांच्या उज्ज्वल भविष्याला मत. भाजपला मत म्हणजे महान भारताच्या रचनेला मत. भाजपला मत म्हणजे मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणं.
हेही वाचा – ‘मावळमधून गद्दारांचा पराभव करून खासदार होणार’; संजोग वाघेरे
सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह यांचं सरकार होतं तेव्हा रोज बॉम्बस्फोट व्हायचे. दहशतवादी भारतात येऊन बॉम्बस्फोट करुन पळून जायचे. काहीच प्रत्युत्तर दिलं जायचं नाही. मोदीजी आले उरी आणि पुलवामामध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला. दहाच दिवसात पाकिस्तानच्या घरात घुसून सर्जिकल स्टाईक आणि एअर स्ट्राईक करुन आतंकवाद्यांना संपवलं. काश्मीर आपला आहे की नाही? काश्मीर भारताचा भाग आहे की नाही? मोदींनी काश्मीरला भारताशी जोडलं. काँग्रेसने कलम ३७० ७० वर्षे लटकवत ठेवलं होतं, असं अमित शाह म्हणाले.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर रिक्षा आहे. या रिक्षाची चाकं पंक्चर झाल्याने खिळखिळी झाली आहे. महाराष्ट्राला पंक्चर ऑटो विकास देऊ शकते का? तर नाही. त्यामुळे महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्रात उत्तम काम करतं आहे, असंही अमित शाह म्हणाले.