औरंगाबादमधील लॉकडाउनला AIMIMचे खासदार इम्तियाज जलील यांचा कठोर विरोध
औरंगाबाद – वाढत्या रुग्णसंख्येमुळे ठिकठिकाणी लॉकडाउन पुकारण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने 30 एप्रिलपासून कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आलाय. मात्र या लॉक डाउनला AIMIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन लावणं म्हणजे उद्योजकांना खुश करण्याचा प्रयत्न असल्याची टीका जलील यांनी केली आहे.
वाचा :-मुंबईत 6,123, पुण्यात 6,591 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शनिवारी लॉकडाऊनबाबतचे आदेश काढले आहेत. लॉकडाऊन दरम्यान किराणा दुकानं सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत, तर दूध विक्री आणि भाजीपाल्याची विक्री सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंतच सुरु राहणार आहे. महत्वाची बाब म्हणजे लॉकडाऊनमधून उद्योग श्रेत्राला वगळण्यात आलं आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला पण रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहे.
काय सुरु राहणार?
औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊनमधून उद्योग क्षेत्राला वगळण्यात आलं आहे. सर्व उद्योग आणि त्याचे पुरवठादार नियमानुसार काम करतील. औद्योगिक वस्तूंचा पुरवठा सुरळीत चालू ठेवण्यासाठी स्थानिक, आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक शासकीय नियमानुसार सुरु राहणार आहे. त्याचबरोबर वृत्तपत्रे, नियतकालिकांची छपाई आणि वितरण सुरु राहील. डिजिटल आणि प्रिंट मीडिया यांची कार्यालयेही शासकीय नियमानुसार सुरु राहणार आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा असे आदेशही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.