“४०० पारच्या घोषणेने कार्यकर्ते निवांत राहिले, पण आता गाफील राहू नका” ; मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/mahaenews-58-780x470.jpg)
CM Eknath Shinde । लोकसभा निवडणुकीत भाजपकडून प्रचारादरम्यान ‘४०० पार’च्या घोषणा देण्यात येत होत्या. आता याच घोषणेमुळे निवडणुकीत मोठा फटका बसला असल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. “यावेळी तुम्ही गाफील राहू नका.”असा सल्ला देखील यावेळी मुख्यमंत्र्यानी दिला.
ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या विजयसंकल्प मेळाव्यात बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ” या निवडणुकीत तुम्ही गाफील राहू नका, आपण सर्व कार्यकर्ते आहात, एक-एक मत आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत माझ्या एका मताने काय होणार, आपण जिंकणारच आहोत, असा विचार करुन गाफील राहता कामा नये. आम्ही पंतप्रधान मोदीजींसोबत 400 पारच्या घोषणेबाबत बोललो. या घोषणेमुळे कार्यकर्ते रिलॅक्स झाले, असे मी त्यांना सांगितले. पण आता तसं करायचं नाही. आपले मोदीजी पंतप्रधानपदी बसलेले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणी कितीही जंग जंग पछाडले तरी मोदीजी त्यांच्यावर भारी पडतील,” असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या त्यात आपण जिंकलो आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांना चिंता नाही, विजय आपलाच आहे. महायुती म्हणून आपण ही निवडणूक मनावर घेतली आहे. आताच्या निवडणुकीत कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला ठरलेला आहे, भिवंडी अपवाद ठरला. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी फेक नरेटिव्ह लोकांपर्यंत पोहोचवले, त्यामध्ये ते यशस्वी ठरले. फेक नरेटिव्ह पसरवण्यात काही स्वयंसेवी संस्थांचाही हात होता. सगळ्याच स्वयंसेवी संस्था वाईट नाहीत. पण काही स्वयंसेवी संस्थांमध्ये शहरी नक्षली घुसले आहेत. हे सर्वजण मोदी द्वेषाने पछाडलेले आहेत. या एनजीओंनी देखील मोदी हटावचा नारा दिला होता, अशी टीका त्यांनी केली.
महाविकास आघाडीने जास्त जागा जिंकल्या असल्या तरी मतांची टक्केवारीतील फरक फार कमी आहे. आज मुंबईतही आपल्याला त्यांच्यापेक्षा 2 लाख मतं जास्त आहेत. आज आपला स्ट्राईक रेट उबाठा पेक्षा जास्त आहे. राज्यातील मतांच्या टक्केवारीत आपण थोड्या फरकानेच मागे आहोत. लोकसभा निवडणुकीत 30 जागांवर विजय मिळाल्यानंतर आम्ही 180 जागा जिंकणार, असे मविआ म्हणत आहे. असे गणित कुठे असते का, असा सवाल शिंदे यांनी विचारला.