मणिपूरच्या गोलंदाजाची कमाल, एकाच डावात घेतले १० बळी
१९ वर्षाखालील कूचबिहार करंडक स्पर्धेत मणिपूरच्या रेक्स राजकुमार सिंहने ऐतिहासीक कामगिरीची नोंद केली आहे. अरुणाचल प्रदेशविरुद्ध सामन्यात खेळत असताना राजकुमार सिंहने १० बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. ९.५ षटकात राजकुमारने ६ षटकं निर्धाव टाकत १० धावा देऊन संपूर्ण संघ तंबूत धाडला. राजकुमारच्या माऱ्यासमोर अरुणाचल प्रदेशचा संघ अवघ्या ३६ धावांमध्ये गारद झाला. १८ वर्षीय डावखुऱ्या राजकुमारने ५ फलंदाजांना त्रिफळाचीत, दोघांना पायचीत व तिघांना झेलबाद केलं. या सामन्यात राजकुमारला हॅटट्रीक करण्याच्या ३ संधीही चालून आल्या होत्या.
४ दिवसीय सामन्यात मणिपूरने पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिल्या डावात १२२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल राजकुमारच्या माऱ्यासमोर अरुणाचल प्रदेशचा संघ कोलमडला. विजयासाठी ५५ धावांचं आव्हान असलेल्या मणिपूरने ७.५ षटकात हे आव्हान पूर्ण केलं. राजकुमारने या सामन्यात तब्बल १५ बळी घेतले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे आणि जिम लेकर या दोन गोलंदाजांनाच अशी कामगिरी केली आहे. या कामगिरीनंतर राजकुमारवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. आयसीसीनेही राजकुमारच्या या कामगिरीची दखल घेत त्याचं अभिनंदन केलं आहे.