बॉम्बस्फोटाने भारतात विनाश घडवणार, धमकी देणाऱ्या तरुणाला अटक
बॉम्बस्फोटाने भारतात विनाश घडवणार, धमकी देणाऱ्या तरुणाला अटक
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
गेल्या काही दिवसांपासून बॉम्ब हल्ल्याच्या अनेक अफवा मुंबईत उठत आहेत. अनेक धमकीचे फोन प्राप्त होत आहेत. त्यातच, भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देऊ असा फोन मुंबईत आल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. मात्र, मुंबई गुन्हे शाखेने या फोनकॉलची कसून चौकशी केली असून पोलिसांनी धमकी देणाऱ्या तरुणाला तत्काळ अटक केलीआहे.
रणजीत कुमार सहानी (२५) हा मुळचा बिहारचा रहिवासी असून त्याने व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल करून बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली होती. त्याने मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ला धमकीचा फोन केला होता. फोन येताच, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सहानीने हैदराबाद येथून कॉल केल्याचं म्हटलं आहे. कॉल केल्यानंतर तो ट्रेनमध्ये चढला आणि मुंबईच्या दिशेने निघाला. मोबाईल लोकेशनवरून मुंबई गुन्हे शाखेने त्याला मुंबईतील चर्नीरोड परिसरातून अटक केली.
झवेरी बाजार उडवण्याची मिळाली होती धमकी
असाच प्रकार १९ सप्टेंबर रोजी घडला होता. झवेरी बाजारमध्ये बॉम्ब ठेवला असून या बॉम्बस्फोटामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता असल्याचा एक निनावी कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला आला. मात्र पोलिसांना तपासाअंती काहीच सापडलं नसल्याने पोलिसांनी कॉलधारकालाच अटक केली आहे. दिनेश सुतार (२४) असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. हा तरुण मुळचा सोलापूरचा असून नोकरीनिमित्त तो मुंबई असतो. मात्र, सध्या तो बेरोजगार आहे. गावी घरच्यांशी भांडण झालं म्हणून तो पुन्हा मुंबईत आला. काळबादेवी येथील शकुंतला इमारतीजवळील एका दुकानाबाहेर तो राहतो. घरच्यांशी भांडण झालं म्हणून त्याने पोलिसांना फोन करून अफवा उठवली, अशी माहिती पोलिसांनी दिली.