पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या गावात नंदनवन फुलवण्याचा ध्यास ; दाउदी बोहरा समाज व वर्ल्ड व्हिजन संस्थेचा पुढाकार
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या गावात नंदनवन फुलवण्याचा ध्यास दाउदी बोहरा समाजाने वर्ल्ड व्हिजन या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने घेतला आहे.यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या का होतात याचा अभ्यास केल्यानंतर पाणी हा एक घटक देखील कारणीभूत असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर वर्ल्ड व्हिजन इंडिया या स्वयंसेवी संस्थेने दुष्काळग्रस्त गावाची पाहणी केली. त्यापैकी त्यांनी चिंचघाट, वडनेर, मारथड आणि शिवणी या चार गावांची निवड केली.
गेल्या दोन वर्षांपासून या गावात जलसंवर्धनाचे काम सुरू केले. त्यामुळे गावातील विहिरीची जलपातळी वाढली. त्यामुळे पावसाच्या भरवशावर केवळ कपाशीचे पीक घेणारे शेतकरी आता गहू, हरभरा आणि इतर पीकेही घेऊ लागली आहेत. चार गावातील ३३ विहिरींची जलपातळी वाढली आहे. या उपक्रमाबाबत वर्ल्ड व्हिजनचे समूह संचालक सोनी थॉमस म्हणाले, चार गावात हा उपक्रम ६ मार्च २०२० पासून हाती घेण्यात आला. यासाठी दाऊद बोहरा समाजाने पुढाकार घेतला. .प्रोजेक्ट राईजचे वरिष्ठ पदाधिकारी आणि बुरहानी फाऊंडेशनचे विश्वस्त शब्बीर नजमुद्दीन म्हणाले, दाउदी बोहरा समाजातर्फे प्रोजेक्ट राईज हा प्रकल्प राबवण्यात येते. त्याअंतर्गत ग्रामीण भागात पाणलोट व्यवस्थापनाचे काम हाती घेऊन ग्रामस्थाचे जीवन सुखी करण्याचा प्रयत्न आहे.