युतीत 25 वर्षे का सडली?, उध्दव ठाकरेंनी केला मोठा खुलासा
मुंबई – गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजप युती तुटली. त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका सभेमध्ये बोलताना २५ वर्ष युतीत सडली, असे वक्तव्य केले होते. त्याच वक्तव्यासंदर्भात संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला. त्यावर उद्धव म्हणाले, २५ वर्षे सडली याचा अर्थ समजून घ्या.
युती केल्यानंतर आम्ही गाफील राहिलो… शिवसेनाप्रमुखांनी त्या वेळी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. पण युती झाल्यानंतर आमच्यात थोडा गलथानपणा आला. तो जो काही गलथानपणा होता तो आता राहणार नाही. विचार पोहोचवणं, विचार पसरवणं हा काही गुन्हा नाही. याचा अर्थ असा नाही की, मी फक्त निवडणुकाच डोळय़ासमोर ठेवतो… शेवटी राष्ट्र उभं करणं, देश उभा करणं हे महत्त्वाचं आहे.
‘युती’ म्हणून माझ्या वाटय़ाला जेवढय़ा जागा आल्या आहेत तेवढय़ातच शिवसेना ठेवावी का? बाकी ठिकाणी शिवसेना न्यायची नाही का?…कारण शिवसेना हा केवळ पक्ष नाही, तर शिवसेना हा एक विचार आहे असे उद्धव म्हणाले.
…म्हणून युती केली
शिवसेना-भाजपा युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी शिवसेना कधीच सत्तेसाठी लाचार झाली नाही. शिवसेना-भाजपची युती ही हिंदुत्वाची, देशाची गरज होती. देश पुन्हा काँग्रेस व भ्रष्टाचाऱ्यांच्या घशात घालायचा काय?’’ असा सवाल टीकाकारांना केला. आम्ही वेगळे लढलो असतो तर कोण किती जिंकलं असतं याच्यापेक्षा कुणाचं किती नुकसान झालं असतं याचा विचार करायला हवा. विरोधी पक्षाच्या आघाडीकडे अजूनही जागावाटप नीट होत नाहीये. त्यांचा एक नेता ठरत नाहीये. राज्यामध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना असं वाटतंय की त्यांचं कोणी ऐकत नाही. शरद पवार एकदा लढायचं म्हणताहेत, एकदा लढायचं नाही म्हणताहेत. म्हणजेच कुठेही ना शेंडा ना बुडखा… ना आकार ना उकार. अशी विरोधी पक्षांची एक मोट जबरदस्तीने बांधण्याचा प्रयत्न होतोय. त्यांच्या हातात देश द्यायचा काय?