खासदारसाहेब… तेव्हा तुमची दातखिळी बसली होती का? मराठा सेवा संघ-संभाजी बिग्रेडचा सवाल
- अन्ं खासदार आढळराव पाटलांना, ते मराठा असल्याचा झाला साक्षात्कार
- छत्रपतींचा चुकीचा इतिहास सांगणा-या विरोधात, ‘तुमची दातखिळी बसली होती का?
पिंपरी ( महा ई न्यूज ) – जोपर्यंत डाॅ. अमोल कोल्हे शिवसेनेत होते. त्यावेळेला त्यांना जात नव्हती, तेव्हा त्यांची जात कंची हेही इचारलं नव्हतं. आता कोल्हेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि अवघ्या मराठी मुलखाला कोल्हेची जात कळाली. एका माळ्याच्या पोरानं स्वतःचे घरदार-जमिन जुमला घाण ठेवून युवराज छत्रपती संभाजी महाराजाचा खरा इतिहास मराठी जनतेपुढे आणला. त्यांना तुम्ही त्यांची जात विचारुन स्वताः तुम्हाला मराठा असल्याचा साक्षात्कार झालाय. परंतू, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास लिहिणा-या आणि सांगणा-या वसंत कानेटकर, राम गणेश गडकरी, ब.म.पुरंदरे यांच्याबद्दल कधी तुम्ही ब्र शब्द काढला नाही. तेव्हा खासदारसाहेब… तुमची दातखिळी बसली होती का? असा सवाल संभाजी बिग्रेडने शिवसेना खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना विचारला आहे.
मराठा सेवा संघ-संभाजी बिग्रेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे, कार्याध्यक्ष गणेश दहिभाते यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शिवजयंती तिथीला साजरे करणे, जेम्स लेन प्रकरणी मूक गिळून गप्प बसणे, दादोजी कोंडदेव पुतळा काढल्यानंतर त्याला विरोध करणे, शिवस्मारक रखडवत ठेवणे, मराठा समाजाचे आरक्षण प्रलंबित ठेवणे, तसेच मराठा क्रांती मोर्चाला शिवसेना ‘मुका मोर्चा’ त्याच्या मुखपत्रातून हिणवते. त्यावेळेस खासदारसाहेब… आपण गप्पगिळू भूमिका घेतली होती.
मात्र, आज आपण डाॅ. अमोल कोल्हे हे मराठा जातीचे नसून माळी समाजाचे आहेत. असे बोलून खासदार आढळराव पाटील यांनी जातीचं महत्व समजून घ्यायला लय उशीर केला. डाॅ. कोल्हे यांच्या माध्यमातून तुमच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे. कोल्हे हे जातीपातीच्या राजकारणाच्या पुढे गेले आहेत. परंतू, खासदार साहेबांनी स्वताःच्या स्वार्थ व राजकीय अस्तित्व टिकवून जातीची ढाल पुढे करण्याचा केविलवाणा प्रयत्न कदापिही यशस्वी होणार नाही.
तसेच डाॅ. कोल्हे यांना कोल्हेकुई म्हणून हिणवणा-या खासदार आढळराव पाटील यांना एकच सांगावे असे वाटते की, तुम्ही खरेच मराठ्यांचे असाल तर तुमच्या नावाला जागा. शिवाय ते जन्माने मराठा नसले तरी कर्माने मराठा असणा-या कोल्हे यांच्यामागे संपुर्ण मराठा समाज उभा राहील, यात शंका नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.