कोपर्डी येथील ‘निर्भया’च्या समाधीवर बसवण्यात आलेल्या पुतळ्यावरून तणाव
कर्जत: कोपर्डी येथील ‘निर्भया’च्या समाधीवर बसवण्यात आलेल्या पुतळ्यावरून वाद निर्माण होऊ लागल्याने तिच्या कुटुंबीयांनी हा पुतळा काढून घेतला आहे. त्यामुळे ‘स्मारक की समाधी’ या वादावर आता पडदा पडला आहे. दरम्यान, माझ्या मुलीमुळे मराठा समाज एकत्र आला असून, त्याची आठवण म्हणून क्रांतीज्योत उभी करावी, अशा भावना पीडित मुलीच्या आईने व्यक्त केल्या आहेत.
कोपर्डी येथे राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांनी निर्भयाचे स्मारक उभे केले होते. मात्र यावर निर्भयाचा पुतळा बसवण्यापूर्वीच संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी निर्भयाचे स्मारक उभे करण्यास तीव्र विरोध केला होता. हे स्मारक नसून समाधी आहे, असे निर्भयाच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात येत होते. तर, गुरुवारी (१३ जुलै) रात्री साडेअकरा वाजता त्या उभारलेल्या स्मारकावर निर्भयाचा पुतळा कुटुंबीयांनी बसवला होता. या प्रकारामुळे तणाव निर्माण होऊ लागल्याने शुक्रवारी निर्भयाच्या नातेवाइकांनी पुतळा पांढऱ्या कापडाने झाकून टाकला होता. पुतळ्याचे संरक्षण करण्यासाठी पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. परंतु यानिमित्ताने निर्माण झालेला वाद वाढू लागल्याने अखेर कुटुंबीयांनी शनिवारी दुपारी हा पुतळा काढून घेतला.