‘वसंतदादा’साठी व्यंकटेश्वरा, उगार शुगर, रेणुकाकडून विचारणा – दिलीप पाटील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/04/0Vasantdada_Sugar_Factory_3.jpg)
सांगली – सांगलीचा वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वाने घेण्यासाठी जिल्हा बॅंकेच्या प्रशासनाकडे व्यंकटेश्वरा ग्रुप, उगार शुगर आणि रेणुका उद्योग समूहाकडून आज चौकशी झाल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आज दिली. ते म्हणाले, ‘‘कारखाना भाडेपट्ट्याने देण्यात कोणताही कायदेशीर त्रुटी राहू नये यासाठी कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे. वसुलीसाठी कारखाना कोणाच्या गळ्यात घालणार नाही. विलंब झाला तरी चालेल, मात्र शेतकऱ्यांच्या विकासासाठी कारखाना चालू राहिलाच पाहिजे, अशी बॅंकेची भूमिका आहे.’’ असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बॅंकेने ९३ कोटी वसुलीसाठी सिक्युरिटायझेशन कायद्याने वसंतदादा कारखाना भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. निविदेसाठी अर्जविक्री आजपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी एकानेही अर्ज नेला नसला तरी बॅंक प्रशासनाकडे व्यंकटेश्वरा ग्रुप, उगार शुगर आणि रेणुका उद्योग समूहाने चौकशी केली. अर्जाची अंतिम मुदत ३ मेपर्यंत आहे. निविदा अर्जाची किंमत वीस हजार रुपये, बयाणा रक्कम एक कोटी रुपये ठेवली आहे. वसंतदादा साखर कारखाना, डिस्टिलरी युनिटसाठी ८ मे २०१७ रोजी निविदा उघडली जाणार आहे. वसंतदादा साखर कारखान्यासाठी राजारामबापू सहकारी साखर कारखान्यासह अथणी शुगर, दालमिया हेही खासगी कारखाने स्पर्धेत असतील.
अध्यक्ष पाटील म्हणाले, ‘‘वसंतदादा कारखान्याकडील बॅंकांच्या देण्यांसह ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, विविध शासकीय करांची रक्कम द्यावी लागणार आहे. देणी अंतिम करण्यासाठी आमची सीए याच्याशी चर्चा सुरू आहे. कोणतीही कायदेशीर चूक राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. कारखान्यांच्या या प्रक्रियेला संचालक मंडळ जबाबदार असेल. काही चुकले तर त्यांची आमच्याकडून वसुली होऊ शकते. याची काळजी घेऊन व्यवहार पार पाडला जाईल. घेतलेल्या संस्थेने कारखाना सुरळीत चालविला पाहिजे, अशीच बॅंकेची भूमिका आहे. निविदेसाठी विलंब झाला तरी चालेल, अशीच भूमिका राहील. आमच्या पैशासाठी कारखाना कोणाच्या गळ्यात घालणार नाही.’