वसुंधरा राजे जिंकल्या पण गड गेला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/vasundhara_raje-eps_150875537464_830x553.jpg)
राजस्थानमध्ये भाजपाचा पराभव झाला असून दर पाच वर्षांनी सत्तांतर करण्याची परंपरा कायम राहिली आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी विजयी होतो आपली पत कायम राखली आहे. मात्र सत्ता राखण्यात त्यांना पूर्णपणे अपयश आलं. वसुंधरा राजे यांच्याविरोधात काँग्रेसने जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली होती. मात्र मानवेंद्र सिंह वसुंधरा राजे यांना पराभूत करण्यात अपयशी ठरले.
राजस्थानमध्ये गेल्या 25 वर्षांपासून काँग्रेस आणि भाजपला सत्ता आलटून-पालटून मिळत आली आहे. राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्तांतर होत असतं. 2013 मध्ये वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. वसुंधरा राजे यावेळी सत्ता कायम राखत परंपरा मोडीत काढतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र मतदारांनी काँग्रेसला निवडून देत भाजपाला नाकारलं आहे. दरम्यान काँग्रेसकडून सचिन पायलट आणि माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत हे काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात आहेत.
अहंकारामुळे भाजपाचं सरकार गेलं असल्याची टीका काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी केली आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसला आघाडी मिळाली असून भाजपाला पराभवाचा धक्का बसला आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर अशोक गहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली.
‘अहंकारामुळे भाजपाचं सरकार गेलं आहे. भाजपाकडे निवडणूक लढण्यासाठी साधा मुद्दाही नव्हता. काँग्रेसमुक्तीची भाषा करणारेच मुक्त होतील’, असा टोला अशोक गहलोत यांनी लगावला आहे. निकालांमुळे भाजपाच्या गर्वाचा पराभव झाला असल्याची टीका करताना सत्तेत आल्यानंतर विरोधकांना सोबत घेऊन काम करु असंही ते म्हणाले आहेत.