‘महाराष्ट्राचा पर्यटन ब्रँड अधिक प्रभावी करण्यासाठी डिजिटल प्रसिद्धीवर भर’; मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : महाराष्ट्राचा पर्यटन ब्रँड राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी डिजिटल प्रसिद्धी, प्रभावी जनसंपर्क आणि नाविन्यपूर्ण माध्यमांचा व्यापक वापर करणे आवश्यक आहे. राज्याची समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक वैभव आधुनिक माध्यमांतून जगासमोर प्रभावीपणे मांडले गेले पाहिजे, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
पर्यटन संचालनालयामार्फत २०२६-२७ या वर्षातील जनसंपर्क विभाग आणि सामाजिक माध्यमांअंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्यात आला. या बैठकीस पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे, पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे, सहसंचालक संतोष जाधव, सहायक संचालक रवींद्र पवार, कार्यकारी अभियंता आकाश चकोर तसेच संबंधित मीडिया एजन्सींचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.
हेही वाचा – कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून आढावा
बैठकीत महाराष्ट्र पर्यटनाच्या प्रसिद्धी, जनसंपर्क आणि सामाजिक माध्यमांवरील विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पर्यटकांना अचूक, विश्वासार्ह आणि आकर्षक माहिती वेळेत उपलब्ध करून देणे, पर्यटन विभागाची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट करणे तसेच राज्यातील पर्यटनस्थळांची देश-विदेशात प्रभावी प्रसिद्धी करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा अधिक परिणामकारक वापर करण्याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यावेळी नाविन्यपूर्ण जनजागृती मोहिमा, दर्जेदार डिजिटल आशय निर्मिती, सामाजिक माध्यमांवरील प्रभावी धोरण, माध्यमांमधील समन्वय तसेच पर्यटनविषयक माहितीचे नियोजनबद्ध आणि वेळेवर प्रसारण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची वैशिष्ट्ये अधिक प्रभावीपणे पर्यटकांपर्यंत पोहोचविणे, राज्याचा पर्यटन ब्रँड अधिक सक्षम करणे आणि डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने महाराष्ट्राची पर्यटन क्षेत्रातील स्पर्धात्मक ओळख अधिक दृढ करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.





