“मेलो तर मेलो, पण उपोषण करणारच”; मनोज जरांगे पाटलांचा आरपारचा इशारा

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत आक्रमक आणि टोकाची भूमिका घेतली आहे. आगामी ३० मे पासून प्रखर उन्हात बेमुदत उपोषण करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. “देशात यापूर्वी कुठेच झाले नसेल, इतके कठोर उपोषण मी करणार असून यादरम्यान उष्माघाताने माझा बळी गेल्यास त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल,” असा थेट आणि गंभीर इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
आगामी उपोषणाची रूपरेषा आणि आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी यावेळी मंडपात न बसता उघड्यावर, रखरखत्या उन्हात उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी ३० मे पासून रखरखत्या उन्हात उपोषण करणार आहे. उपोषणादरम्यान मेलो तर मेलो. उष्माघातानं बळी गेल्यास त्याला सरकार जबाबदार असेल. यावेळी सरकारचा नाही तर माझा तुकडा पडेल, असं जरांग पाटील म्हणाले.
हेही वाचा
‘मुस्लिम औरंगजेबाची नव्हे, आपलीच अवलाद’; रामदास आठवले यांचे मोठे वक्तव्य
उन्हात किती त्रास होईल याचा विचार करत नाही. एक तर सरकारचा तुकडा पडेल नाहीतर माझा, बाज टाकून रखरखत्या उन्हात मी यावेळी उपोषण करणार आहे. पायात काही चप्पल नसेल, अन्नपाणी नसेल, काय व्हायचं होऊ. मराठा समाजातील मुलांचा सरकारने उन्हाळा केला आहे. मराठा समाजातील बांधवांनी उपोषणादरम्यान अंतरवाली सराटीकडे येऊ नये. देशात यापूर्वी अशा प्रकारचे, कठोर आणि इतक्या टोकाचे उपोषण झाल्याचे आठवत नाही. तेवढ्या टोकाचं हे उपोषण होईल, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
५८ लाख नोंदी निघाल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार आहात का? कुणबी प्रमाणपत्र मिळालं त्यांना वैधता देणार आहात का? हैद्राबाद गॅझेटियरचा जीआर काढला त्याचे प्रमाणपत्र देणार आहात का? त्याची वैधता देणार का?, असे सवाल जरांगे-पाटील यांनी उपस्थित केले. मराठा आरक्षण देताय म्हणजे काय करताय? असा प्रश्न करत मराठा समाजाची मते हवीत पण आरक्षण द्यायला नको, असेही जरांगे पाटील म्हणाले.
तुमच्याकडून हल्ले केले जातात आणि आमच्याविरोधात गुन्हे दाखल केले जातात? सातारा संस्थानाचे गॅझेट लागू केले जात नाही? मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करायाला किती वेळ लागतो? आमचा पाच पिढ्यांचा बॅकलॉग कोण भरुन काढणार? असेही पाटील म्हणाले. यावेळी आरपारची लढाई करणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.





