“पार्थ पवारांच्या डोक्यात हवा गेलीये, स्वतःची गँग घेऊन फिरतात”; अंजली दमानिया

पुणे | सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांच्यावर अत्यंत गंभीर आणि शेलक्या शब्दांत प्रहार केला आहे. “पार्थ पवारांच्या डोक्यात हवा गेली असून ते स्वतःची गँग घेऊन फिरत आहेत. अजितदादांनंतर आपणच पक्षाचे सर्वेसर्वा आहोत, असे त्यांना वाटू लागले आहे,” अशा खरमरीत शब्दांत दमानिया यांनी पार्थ पवारांवर शरसंधान साधले. दमानिया यांच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
माध्यमांशी बोलताना अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफुशीवर थेट बोट ठेवले. त्या म्हणाल्या, “पार्थ पवार सध्या स्वतःला पक्षाचे सर्वेसर्वा समजत आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पार्थने त्यांचेच औषध पाजले आहे. पक्षाच्या यादीतून पटेल आणि तटकरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची नावे वगळण्यात आली आहेत. भुजबळांनाही बाजूला ठेवल्याचे ऐकून बरं वाटलं. पार्थ पवार सध्या पक्षाचे राष्ट्रीय गणित पाहत असल्याने पक्षात अंतर्गत धुसफुस वाढली आहे.”
हेही वाचा
‘खेळण्याची भूक अजूनही कायम..’; वनडे वर्ल्डकप खेळण्याबाबत विराट कोहलीचे मोठे वक्तव्य
मुंढवा जमीन घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार पार्थ पवार: दमानियांचा दावा
अंजली दमानिया यांनी केवळ राजकीय टोलेबाजीच केली नाही, तर मुंढवा जमीन घोटाळ्याचा संदर्भ देत थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले. “मी मुंढवा जमीन घोटाळ्याचा खुलासा केला आहे. या घोटाळ्यात पार्थ पवार पूर्णपणे अडकला आहे, मात्र त्याचे नाव कुठेच समोर आणले जात नाही. यामागे भाजप आणि सुनील तटकरे गँगचे षडयंत्र आहे. अचानक चार्जशीटमध्ये दिग्विजय पाटील याचे नाव समोर आणले गेले. या घोटाळ्यात दिग्विजय हा केवळ १ टक्का पार्टनर आहे, तर पार्थ पवार ९९ टक्के पार्टनर असून तोच मुख्य सूत्रधार आहे. त्यामुळे ही चार्जशीट नक्कीच चुकली आहे,” असा खळबळजनक दावा दमानिया यांनी केला.
‘सरन्यायाधीशांनी झुरळ म्हटले तरी अभिमान’
यावेळी दमानिया यांनी सरन्यायाधीशांनी त्यांच्याबद्दल केलेल्या एका विधानाचाही समाचार घेतला. “सरन्यायाधीशांनी माझा उल्लेख ‘झुरळ’ असा केला होता. ते ऐकून मला धक्का बसला, पण सरन्यायाधीश मला झुरळ म्हणत असतील तर मला त्याचा अभिमान आहे. सत्ताधारी सध्या संविधानाच्या विरोधात आणि विचित्र वागत आहेत, त्यांनी याबद्दल माफी मागितली पाहिजे,” अशी मागणीही त्यांनी केली. “आम्ही व्यवस्थेवर आणि भ्रष्टाचारावर प्रश्न विचारणार नाही का?” असा सवाल करत त्यांनी आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. या गंभीर आरोपांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय उत्तर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





