शिवाजी महाराजांचा अपमान करणे हे भाजपचे धोरण; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

मुंबई | बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेले विधान आक्षेपार्ह असल्याचा आरोप करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे हे भाजप आणि संघाचे राष्ट्रीय धोरण असल्याचा गंभीर आरोप त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूर येथे बोलताना शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले होते. या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हे विधान झाले, तरी त्यांनी निषेध नोंदवला नाही, अशी टीका केली. शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही आणि संबंधितांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा
डोनल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमात गोळीबार! ट्रम्प सुरक्षित, संशयित ताब्यात
छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे प्रेरणास्थान असून त्यांच्या विचारांनी महाराष्ट्राला दिशा दिली आहे. हिंदवी स्वराज्याची संकल्पना देशाच्या संविधानाशी सुसंगत असल्याचे सांगत, शिवाजी महाराजांच्या इतिहासाची विकृत मांडणी करून त्यांची बदनामी केली जात असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.
दरम्यान, यापूर्वीही काही राजकीय आणि सामाजिक व्यक्तींनी शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधाने केली असल्याचे नमूद करत, अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई होत नसल्याने चुकीचा संदेश समाजात जात असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने अशा वक्तव्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.





