इराण युद्धाचा एअर इंडियाला मोठा फटका; तब्बल २,५०० उड्डाणे रद्द, एअरलाईनची क्षमता ३० टक्क्यांवर!

नवी दिल्ली : इराणमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे एअर इंडियाने गेल्या तीन आठवड्यांत पश्चिम आशियातील सुमारे २,५०० उड्डाणे रद्द केली आहेत. सध्या या भागात एअर इंडियाच्या नियमित वेळापत्रकाच्या तुलनेत केवळ ३० टक्के उड्डाणे सुरू असल्याची माहिती एअरलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कॅम्पबेल विल्सन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात दिली आहे.
विल्सन यांनी पत्रात नमूद केले आहे की, मध्यपूर्वेतील संघर्षामुळे केवळ एअर इंडियाच नव्हे, तर संपूर्ण विमान वाहतूक क्षेत्रावर आर्थिक परिणाम होऊ लागला असून विमान इंधनाचे दर दुपटीने वाढले आहेत. हवाई क्षेत्र आणि विमानतळ बंद असल्याने किंवा सुरक्षिततेच्या कारणास्तव एअर इंडियाला आपली ७० टक्के उड्डाणे स्थगित करावी लागली आहेत.
विमानांच्या इंधनाचे (Jet Fuel) दर दुपटीहून अधिक वाढले आहेत. याचा मोठा आर्थिक फटका पुढील महिन्यापासून बसण्याची शक्यता आहे. वाढत्या खर्चाची भरपाई करण्यासाठी विमान कंपनीने नवीन तिकिटांवर ‘फ्युएल सरचार्ज’ (इंधन अधिभार) लागू केला आहे. ब्रिटन, युरोप आणि उत्तर अमेरिकेला जाणारी विमाने आधीच लांबच्या मार्गाने जात होती, आता त्यात आणखी बदल करून ती अधिक लांबून वळवण्यात आली आहेत. यामुळे वेळ आणि इंधन दोन्ही जास्त लागत आहे.
हेही वाचा – ‘आम्हीच त्याचा भांडाफोड केला’, खरात प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा
आर्थिक अनिश्चिततेमुळे प्रवाशांच्या मागणीवरही परिणाम होत आहे. प्रत्येक ग्राहक वाढीव भाडे देण्यास तयार नसतो. त्यामुळे मागणी घटण्यापूर्वी आम्ही भाडे किती वाढवू शकतो याला एक मर्यादा आहे, असेही विल्सन यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, काही जागतिक एअरलाईन्स आपली क्षमता कमी करत असताना, एअर इंडियाने युरोप आणि उत्तर अमेरिकेसारख्या बाजारपेठांमध्ये नवीन मागणी पाहून अतिरिक्त उड्डाणे तैनात केली आहेत.
कर्मचाऱ्यांना संबोधित करताना विल्सन म्हणाले की, सध्याची परिस्थिती अत्यंत अस्थिर आहे. जे कर्मचारी प्रत्यक्ष प्रभावित क्षेत्रात काम करत आहेत, त्यांच्या आव्हानांची कंपनीला जाणीव आहे. “आमची टीम परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि त्यानुसार बदल करत आहे. सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता राहील,” असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.





