तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दणदणीत विजय; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन

डोंबिवली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २८८ जागांपैकी २३६ ठिकाणी भाजप उमेदवारांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजपने १३४ ठिकाणी विजय मिळवला आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंंतर भाजप कार्यकर्त्यांनी समर्पित भावाने केंद्र, राज्य सरकारच्या योजनांची माहिती घराघरात पोहचवली.
लोकांचा विश्वास संपादन केला. कार्यकर्त्यांच्या या तळमळीतून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रविवारी कल्याणमधील यशवंतराव चव्हाण मैदानातील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केले.
होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जिल्ह्यात कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या मेळाव्यात कार्यकर्त्यांचे संघटन केले जात आहे. नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या या माध्यमातून संवाद घडवून आणला जात आहे. डोंबिवलीत असेच मेळावे घेण्यात आले. निवडणूक काळात कार्यकर्त्यांमधील विविध प्रकारचे गैरसमज दूर करणे, त्यांना कार्यप्रवृत्त करणे, त्यांच्याशी थेट संवाद साधणे खूप गरजेचे असते. त्यामुळे असे मेळावे भाजपकडून आयोजित केले आहेत, असे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा – ‘महापारेषण’ आणि ‘महानिर्मिती’मध्ये ७६५ के.व्ही. पारेषण प्रकल्पासाठी सामंजस्य करार
केंद्रीय नेत्यांच्या सूचनांप्रमाणे महाराष्ट्रात ५१ टक्के लढाई आपल्याला जिंकायची आहे. यासाठी घरोघर, प्रत्येक नागरिकाशी थेट संपर्क साधण्यावर भर देण्यात येणार आहे. भाजप ही तळागाळात काम करणारी एक मजबूत संघटना आहे. एकदा जबाबदारी पडली की भाजप कार्यकर्ते समर्पित भावाने आपली कामे निभावतात. हे आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील निकालांनी दाखवून दिले आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
केंद्र, राज्य सरकारच्या विविध प्रकारच्या सामान्यांसाठी असलेल्या योजना भाजप कार्यकर्ते घरोघर नेऊन पोहचवित आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम या निवडणुकीत दिसून आला आहे. अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका निवडणुकीत अगदी बूथ पातळीपर्यंत कार्यकर्त्यांनी काटेकोर नियोजन केले होते. प्रत्येक प्रभाग, मतदार यादीचा कार्यकर्त्यांनी बारकाईने अभ्यास केला होता. त्याचा लाभ आपणास येथे झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भविष्यवेधी विकासाची वाटचाल लोकांनी पसंत केली. त्यामुळे हा विजय सुकर झाला, असे चव्हाण यांनी सांगितले.





