आंतरराष्ट्रीय दर्जाचे भुयारी मार्ग देणार कोंडीला कायमचा ब्रेक?
अमेरिका आणि युरोपच्या धर्तीवर मुंबईतही वाहनांसाठी मल्टिमोडल बोगद्यांचे जाळे
मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन घटक जीवनातला अविभाज्य असलेल्या वाहतूककोंडीला लवकरच रामराम केला जाणार आहे. अमेरिका आणि युरोपच्या धर्तीवर मुंबईतही वाहनांसाठी मल्टिमोडल बोगद्यांचे (बहुउद्देशीय भूमिगत वाहतूक व्यवस्था) जाळे निर्माण केले जाणार आहे. मुंबई महापालिकेने त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली असून सहा महिन्यांत अहवाल सादर केला जाणार आहे. भूमिगत वाहतुकीचे जाळे विस्तारण्यासाठी महापालिकेने अंदाजित चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचा अहवाल तयार केला आहे.
मुंबईतील वाढती लोकसंख्या विचारात घेत, प्रवासात सुलभता आणण्यासाठी
आंतरराष्ट्रीयमानकाच्या अनुषंगाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी बहुउद्देशीय भूमिगत वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने महापालिका नियोजन करत असून त्यानुसार सागरी किनारा मार्ग, पूर्वमुक्त मार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग आणि इतर महत्वाचे मार्ग हे भूमिगत बोगद्यांशी जोडले जाणार आहेत. जेणेकरून बोगद्यांतून वाहने थेट त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचू शकतील. योजनेनुसार ज्या वाहनांना मुंबईबाहेर यावे लागेल त्यांना शहरातील रस्त्यावर जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे मुंबईतील वाहतुकीला दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा – ‘भाजपाच्या ध्येयधोरणांची माहिती प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून काम करण्याचा मानस’; निशा यादव
होणार काय ?
मल्टिमोडल बोगद्यांमुळे वाहतूककोंडीच्या त्रासातून सुटका होण्याची अपेक्षा आहे. योजनेंतर्गत तयार होणारे बोगदे मुंबईतील अनेक भागांशी जोडले जाणार आहेत. हे बोगदे पुढील ३० वर्षांच्या वाहतुकीला समोर ठेवून तयार केले जाणार आहेत. या कामासाठी सल्लागाराची नियुक्ती केल्याची माहिती मुंबई वरिष्ठ महापालिकेतील एका अधिकाऱ्याने दिली. सल्लगाराकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे, प्रकल्प व्यवहार्यता पाहणे, नकाशे तयार करून निविदा तयार करणे आणि त्यानंतर मंजूर प्रकल्पाचे व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम पाहणे इत्यादी कामे केली जातील. निविदा काढल्यानंतर या प्रकल्पाचा खर्च साडेपाच वर्ष असणार आहे. तर आता सल्लागाराकडून सहा महिने ते वर्षभरात अहवाल सादर केला जाईल. त्यानतंरच मल्टी-मॉडल बोगद्यांचा प्रकल्प नेमका मुंबईतून कसा होणार हे स्पष्ट होईल.
पर्यावरणहानी नाही
आपत्कालीन परिस्थितीत बोगद्यांचा वापर कसा करता येईल, यासाठी स्मार्ट बोगद्यांची संकल्पना शोधण्यात येईल. पर्यावरणाची हानी होणार नाही, अशा तन्हेने बोगदे बाधले जाणार आहेत. बोगदे तयार करताना त्यात डबल डेक वाहतुकीची कशी व्यवस्था होऊ शकेल याचाही अभ्यास केला जाणार आहे.
सेवा वाहिन्यांसाठीही बोगदा
बोगद्यांतून वाहनांबरोबरच मुंबई महापालिकेसह अन्य विभागांच्या सेवा वाहिन्यांचे जाळेही नेण्यात येणार आहे. त्यामुळेच या प्रकल्पाला मल्टिमोडल बोगदा असे नाव देण्यात आले आहे. २६ जुलै २००५ ला मुंबईत आलेल्या महापुरातही सेवा वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले होते. तर आताही विविध कामांमुळे सेवा वाहिन्यांचे नुकसान होते. त्यामुळे सेवा वाहिन्यांचे जाळेही बोगद्यातून नेण्यात यावेत, असा विचार या प्रकल्पातून पुढे आला आहे.





