काँग्रेसने वंदे मातरमचे तुकडे केले; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप

Narendra Modi | वंदे मातरम या गीताला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत त्या निमित्ताने नरेंद्र मोदींनी लोकसभेत भाषण केलं. वंदे मातरम हा असा मंत्र होता ज्यामुळे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला उर्जा आणि प्रेरणा मिळाली होती. त्याग आणि तपश्चर्या यांचा मार्ग दाखवला होता. अशा वंदे मातरमचं स्मरण करणं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाची प्राथमिकता बदलली. पण भारताची प्रेरणा बदलली नाही. प्रत्येक संकटात वंदे मातरमच्या भावनेसह देश प्रगती करत राहिल. आजही १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला तो भाव दिसतो. देशाच्या लोकशाहीच्या पाठीत जेव्हा आणीबाणी नावाचा खंजीर खुपसला गेला तेव्हा वंदे मातरमनेच त्या प्रसंगातून बाहेर काढलं असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
हेही वाचा : जेजुरीत आरोग्य–विश्वशांतीसाठी भैरव–चंडी यज्ञहवन
१९३७ मध्ये मुस्लिम लिगने वंदे मातरमला विरोध दर्शवला होता. मात्र पंडित नेहरुंनी मुस्लिम लिगला खडे बोल सुनावले नाहीत. मोहम्मद अली जिना यांनी जेव्हा वंदे मातरमला विरोध केला तेव्हा पंडित नेहरुंना त्यांची खुर्ची डळमळीत होताना दिसली. वंदे मातरम या गीतातील काही शब्दांवर मुस्लिम लिगला आक्षेप होता. त्यानंतर काँग्रेसने वंदे मातरमचे तुकडे केले. काँग्रेसने मुस्लिम लिगच्या दबावात हा निर्णय घेतला अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. लांगुलचालनाच्या राजकारणात काँग्रेस गुरफटलं. त्यामुळे भारत फाळणीसारख्या दुर्दैवी निर्णयाला सामोरा गेला, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
महात्मा गांधी १९०४ किंवा १९०५ च्या आसपास म्हणाले होते की वंदे मातरम हे इतकं लोकप्रिय गीत झालं आहे की ते आपलं राष्ट्रगीत झालं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले देशभरातल्या स्वातंत्र्य संग्रामातील सेनानींसाठी महत्त्वाचं गीत झालं होतं. राष्ट्रीय गीताप्रमाणे वंदे मातरम हे गीत प्रचंड लोकप्रिय झालं होतं. देशभरातील लोकांनाही हे गाणं म्हणजे प्रचंड उर्जा आणि शक्ती देणारं गाणं वाटलं होतं. मात्र मागच्या पिढीने या गीतावर अन्याय केला असाही आरोप नरेंद्र मोदींनी केला.





