“बिहारचा विजय आपलाच, आता बंगालची वेळ”; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान

Bihar Election 2025 Results | बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून थोड्या वेळात बिहारच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र, दुपारपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एनडीए आघाडीवर दिसत आहे. बिहार निवडणुकीच्या मतमोजणीचा पहिला कौल हाती येताच केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी एक मोठं विधान केलं आहे.
मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटलं की, “बिहार समजून घेणाऱ्यांना माहिती आहे की बिहारच्या लोकांना जंगल राज (अराजकता) नको आहे. बिहारच्या लोकांना अराजकता नको आहे, किंवा ते भ्रष्ट नेत्यांना सत्ता देऊ इच्छित नाहीत. मी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून हे म्हणतो की बिहारचा विजय आपलाच आहे. आता बंगालची पाळी आहे. आपण बंगालमध्येही विजय मिळवू असा विश्वास आहे, कारण तेथील सरकार अराजकतेचं आहे. ते सरकार रोहिंग्या-प्रभावित सरकार आहे. पण बंगालच्या लोकांनाही सत्य दिसेल”, असं गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : नितीन गिलबिले हत्येतील आरोपी विक्रांत ठाकूर ताब्यात; अमित पठारे अद्याप फरार
एनडीएने पुढे आणलेल्या विकासाच्या अजेंड्याला जनतेनी पाठिंबा दर्शविला आहे. मी पुन्हा सांगतो हा विकास आहे. प्रत्येक जिल्ह्यात अभियांत्रिकी महाविद्यालये आणि वैद्यकीय महाविद्यालये उघडत आहेत. आजच्या तरुणांनी ‘जंगल राज’ पाहिलं नसेल हे खरं आहे. परंतु त्यांच्या पालकांनी पाहिलं असेल. मी स्पष्टपणे सांगतो की, बिहार या भ्रष्ट नेत्यांच्या हाती जाणार नाही”, असं गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे.





