‘राफेल’ प्रकरणी सीबीआय ठाम राहिल्यास देशातील चित्र बदलेल
- पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
कराड – राफेल विमान खरेदी प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीतील वस्तुस्थितीबाबत सीबीआय यंत्रणा ठाम राहिल्यास देशातील चित्र निश्चित बदलेल, असा दावा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू असून, सार्वत्रिक निवडणुकात बदल न झाल्यास देशात हुकूमशाही आली तर नवल वाटणार नसल्याची टीका चव्हाण यांनी या वेळी केली.
काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. राफेल विमान खरेदी हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. या विमानांची पूर्वीची आणि सध्याच्या खरेदीच्या किमतीतील तफावतच या व्यवहारामधील महाघोटाळा दर्शवते. या प्रकरणी स्वायत्त संस्था असलेली सीबीआय मुळाशी जाऊन चौकशी करत असताना त्या अधिकाऱ्यांची बदली करण्याचे काम केंद्राने सुरू केले असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. मात्र, सीबीआयचे अधिकारी ठाम राहिल्यास डिसेंबरअखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागेल, असे राजकीय जाणकरांमधून बोलले जात असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
गोरक्षणाच्या नावाखाली लोकांना ठेचून मारले जात आहे. आज देशातील महिला सुरक्षित असून, महिला अत्याचारात वाढ झाली आहे. अशा प्रकरणांमध्ये सत्ताधारी पक्षातील मंत्री, लोकप्रतिनिधींची नावे समोर आली आहेत. मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागल्याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.
नरेंद्र मोदी यांनी फसवी आश्वासने देऊन सत्ता मिळवली. त्यांच्या कार्यकाळात सर्व घटकांची अधोगती झाली. त्यामुळे लोकांमध्ये तीव्र असंतोष आहे. केंद्र सरकारकडे येत्या निवडणुकीसाठी कोणताही मुद्दा नसल्यामुळे अयोध्येतील राम मंदिर निर्माणाचा मुद्दा रेटण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यामुळे जातीय दंगली घडतील, हल्ले घडवले जातील आणि समाजा समाजांमध्ये फूट पडेल, असे चित्र निर्माण केले जात आहे. मात्र, देशातील विरोधक आता मोदी हटावसाठी एकत्रित येऊ लागले आहेत. आघाडी होणार हे निश्चित झाले आहे आणि त्यादृष्टीने ठोस बोलणी सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.