पाकिस्तानकडून भारतातील रुग्णालये, शाळांवर हल्ले; कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती

India-Pakistan War | पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानकडून भारतातील शहरांवर सातत्याने हल्ल्यांचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवारी नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांनी खळबळजनक माहिती दिली की, पाकिस्तानने काल भारतातील काही रुग्णालये आणि शाळांवर हल्ले केले.
कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पाकिस्तानने पंजाबमधील हवाई तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी सैन्य सीमावर्ती भागात त्यांचे सैन्य हलवत असल्याचे दिसून आले आहे. लष्करी तळांना लक्ष्य करण्याव्यतिरिक्त, पाकिस्तानने श्रीनगर, अवंतीपुरा आणि उधमपूरमधील वैद्यकीय सुविधांनाही लक्ष्य केले, असे कुरेशी यांनी शनिवारी सकाळी सांगितले.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींकडून सुरक्षा परिस्थितीचा आढावा; भविष्यातील कारवाईची रणनीती आखली
पाकिस्तानी सैन्य पश्चिम सीमेवर सतत हल्ले करत आहे. त्यांनी भारताच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी ड्रोन, लांब पल्ल्याची शस्त्रे, युद्धसामग्री आणि लढाऊ विमानांचा वापर केला आहे. भारताने त्यांचे अनेक हल्ले निष्प्रभ केले आहेत. पाकिस्तानने २६ हून अधिक ठिकाणी हवाई मार्गाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे उधमपूर, भूज, पठाणकोट, भटिंडा येथील हवाई दलाच्या तळांवर भारताची उपकरणे आणि जवानांना फटता बसला आहे. त्यांनी पहाटे १:४० वाजता पंजाबच्या हवाई तळाला लक्ष्य करण्यासाठी हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर केला. याचबरोबर पाकिस्तानने भारतातील आरोग्य सुविधा आणि शाळांवरही हल्ला केला, अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली आहे.





