‘डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | सलग दोन वेळा भारताचे पंतप्रधानपद भूषविलेले आणि १९९१ च्या ऐतिहासिक आर्थिक सुधारणांचे शिल्पकार डॉ.मनमोहन सिंग यांचे काल वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. काल संध्याकाळी त्यांना गंभीर अवस्थेत दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल केल्यानंतर रात्री ९.५१ मिनिटांनी रुग्णालयाने त्यांचे निधन झाल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. यानंतर नियोजित सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा – छतावर सौर ऊर्जानिर्मितीसाठी महावितरणतर्फे मोफत नेट मीटर
आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्राशी संबंधित विपूल लेखन सुद्धा त्यांनी केले. त्यांनी केलेले कार्य कायम देशवासियांच्या स्मरणात राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना लाभो, अशी मी प्रार्थना करतो.





