मिशन विधानसभा निवडणूक : भाजपाच्या निवडणूक समितीची आज सायंकाळी महत्वपूर्ण बैठक!
आठवडाभरात उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार : इच्छुकांसह विद्यमान आमदारांकडून ‘देव पाण्यात’

मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात आणि विशेषत: विदर्भात जबर दणका बसल्यानंतर आता भाजपने (BJP) विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. अशातच आता महायुतीच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजप निवडणूक समितीची महत्वाची बैठक पार पडते आहे. आज 13 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,रावसाहेब दानवे ,आशिष शेलार, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह समितीचे इतर नेते राहणार उपस्थित राहणार आहे. भाजपची पहिली यादी येत्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असल्याने या बैठकीत नावावर अंतिम चर्चा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या बैठकीकडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – ‘कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा दाखविणारी ही आणखी एक घटना’; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
आठवडाभरात भाजपची पहिली यादी जाहीर होणार आहे. विधानसभेच्या उमेदवार निश्चितीसाठी पुढील दोन दिवस भाजपच्या महत्त्वाच्या बैठका होणार आहे. भाजपची उमेदवार निवड प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई, कोकण विभागानंतर आज उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्हा निहाय बैठका तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या बैठकही होणार असल्याचे बोलले जातं आहे.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांमध्ये तगडी फाईट होणार असल्याचे बोलले जात आहे. कारण महायुतीतील तीन पक्ष आणि महाविकास आघाडीतील 3 पक्ष आमने-सामने असणार आहेत. शिवाय, शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्याने अनेक विधानसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी एकाच आघाडीत आहेत. त्यामुळे अनेक पक्षांमध्ये बंडखोर उभे राहण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर मतदारांसमोर बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या तिसऱ्या आघाडीचा पर्यायही असणार आहे. तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांकडून मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिवाय, मनोज जरांगे पाटील कोणता निर्णय घेणार याकडे हे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.





