ऑलिम्पिक विजेत्या स्वप्नीलची राज्य सरकारकडून चेष्टा; स्वप्नील कुसाळेच्या वडिलांकडून खंत व्यक्त

Swapnil Kusale | पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात स्वप्नील कुसाळे याने कांस्य पदक जिंकले. स्वप्नीलच्या पदकामुळे ७२ वर्षांनी पुन्हा एका देशासह कोल्हापूरचे नाव झळकावले. स्वप्नीलच्या यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचे वडील सुरेश कुसाळे यांचे फोनवरुन अभिनंदन करत मोठं आश्वासन दिलं होतं. मात्र, राज्य सरकारने स्वप्नीलची चेष्टा केल्याची खंत स्वप्निलच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.
स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे म्हणाले, की राज्य सरकारने जाहीर केलेलं बक्षीस अतिशय तोडके आहे. ऑलिम्पिक पदक पटकवल्यानंतर दोन महिन्यांनी हे बक्षीस जाहीर केलं. नेमबाजांसाठी सरकार इतकं उदासीन आहे असं माहिती असतं तर स्वप्नीलला या खेळाकडे पाठवलंच नसतं. क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकल्यावर राज्य सरकारने राज्यातील क्रिकेटर यांना पाचव्या दिवशी ११ कोटी बक्षीस दिले. पण दोन महिन्यांनी स्वप्नीलसाठी जाहीर केलेलं बक्षीस तोकडे आहे.
हेही वाचा – चिखली घरकुलच्या प्रलंबित प्रश्नांना अखेर मिळाला न्याय!
महाराष्ट्र राज्यात स्वप्नील या एकाच खेळाडूने हे कांस्यपदक जिंकले आहे, असं असताना राज्य सरकारने सुवर्णपदकास ५ कोटी, रौप्यपदकास ३ कोटी, आणि कांस्यपदकास २ कोटी जाहीर केले.पण ही रक्कम ऑलिम्पिक स्पर्धा झाल्यानंतर दोन महिन्यांनी जाहीर केलं. राज्यात कुणी सुवर्णपदक जिंकले नसेल तर ही रक्कम कुणासाठी घोषित केली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
हरियाणा हे राज्य इतकं लहान असून सुद्धा त्यांनी तिथल्या खेळाडूंना मोठं बक्षीस देऊन गौरव केला. क्रिकेटपटूना पाचव्या दिवशी विधिमंडळात बोलवून सत्कार केला जातो आणि स्वप्नीलने पदक जिंकून दोन महिने झाले तरी एक फुल सुद्धा देऊन गौरव केला नाही, हे महाराष्ट्रातील नेमबाजांचं दुर्दैव म्हणावं लागेल असे स्वप्नीलच्या वडिलांनी म्हटले.





