विधानसभा निवडणूकीत भाजपचं मिशन ‘सव्वाशे पार’?
५० जागा जिंकण्याची हमी : ७५ जागा जिंकण्याचं आव्हान

पुणे | लोकसभा निवडणूकीत ‘४५पार’चा नारा दिलेल्या महायुतीला केवळ १७ जागांवरच समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. आता विधानसभेसाठी भाजपने मिशन १२५ पारचा नारा दिला असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यात नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने रणनिती आखण्यास सुरूवात केलीय. यातच भाजपने विधानसभा निवडणूकीसाठी १२५ पार चा नारा दिला आहे. राज्यातील २८८ जागांपैकी १२५ जागा जिंकून आणण्याचं मिशनच भाजपने समोर ठेवले आहे. यात ५० असे मतदारसंघ आहेत की तिथे भाजपला विजयाची १०० टक्के हमी आहे.
हेही वाचा – आम्ही लाडकी बहीण योजना थांबवली पाहिजे का? सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला पुन्हा झापलं
उर्वरित ७५ जागा जिंकण्यासाठी भाजपने वेगळ्या पद्धतीने रणनीती आखली आहे. एक नेता, एक जिल्हा या सुत्रानुसार भाजपने काही नेत्यांवर याची जबाबदारी सोपविली आहे. यात काही बड्या नेत्यांवर प्रत्येकी ७ ते ८ मतदारसंघाची जबाबदारी सोपविल्याची माहिती समोर येत आहे. त्या त्या भागातील जिल्ह्याचा अहवाल नेतृत्वाकडे देण्याचाही आदेश वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्याचे समजत आहे.





