..तर या देशात लोकशाही आहे कुठं? संजय राऊत यांचा सवाल
मुंबई | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर घेतली जाईल, असे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, लाडकी बहीण योजना मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आहे. यासाठी निवडणूक आयोग जर राजकारण्यांच्या हातचं बनणार असेल, तर ते संविधानविरोधी आहे. निवडणूक आयोग ही संविधानिक संस्था आहे. ही संस्था जर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत असेल, तर या देशात लोकशाही आहे कुठं? महाराष्ट्रात जर डिसेंबरमध्ये निवडणूक होणार असेल तर ही सत्ताधाऱ्यांची सोय आहे. आता निवडणूक घेतली तर आपला पराभव होईल, अशी भिती सत्ताधाऱ्यांना आहे. त्यामुळेच त्यांनी हा डाव टाकला आहे.
हेही वाचा – ‘शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला शकुनी मामा’; सदाभाऊ खोत यांची टीका
निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर केली आहे. त्याबरोबर झारखंड आणि महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर व्हायला हरकत नव्हती. सत्ताधाऱ्यांनी झारखंडची निवडणूक पुढे ढकलली, कारण त्यांना हेमंत सोरेन यांचा पक्ष फोडायचा आहे. तुम्ही बघितलं असेल तर चंपई सोरेन हे भाजपात जाणार असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रातही राजकीय कारणांमुळे निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.