मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची नाशिक येथे शांतता रॅलीची सांगता
नेत्याला मोठे करू नका, स्वत:च्या पोरांना आणि जातीला मोठं करा, जात शक्तिशाली करा
![Marathas, protesters, Nashik, peace, rallies,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/manoj-1-780x470.jpg)
नाशिक : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज नाशिक येथे शांतता रॅलीची सांगता झाली. यावेळी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला संबोधित करताना आक्रमक भाषण केलं. जातीला मोठं करायचं आहे, नेत्याला मंत्री करून तुम्हाला काहीही मिळणार नाही.जातीसाठी तुमचं रक्त तापलं पाहिजे, असं जरांगे पाटील म्हणाले.
स्पर्धा वाढली आहे.स्पर्धेच्या युगात आपल्या जातीला आणि लेकरांना वाचवा. मी समाजासाठी जगतोय. एक-एक क्षण माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. कोणत्या क्षणी मरण येईल मला माहिती नाही. सर्वजण माझ्यावर टपून आहेत. सगळ्यांनी मलाच उघड पाडण्याचं ठरवलं आहे. माझं स्वप्न घेऊन मी उभा आहे, असं ते म्हणाले.
मला शारीरिक वेदना असल्या तरी मी समाजासाठी इथे आहे. माझे स्वप्न पूर्ण होईपर्यंत मी मागे हटत नाही. मराठ्यांचे पोर आरक्षण घेऊन अधिकारी झालेले बघायचं आहे, हे माझं स्वप्न आहे. इतक्या वेदना मी समाजाला शक्तिशाली करण्यासाठी सहन करत आहे. मराठ्यांचा दगा करणारी औलाद माझी नाही, असं जरांगे म्हणाले.
नेत्याला मोठे करू नका. तुमच्या जातीला मोठे करा. स्वत:च्या पोरांना आणि जातीला मोठं करा. स्वत:ची जात शक्तिशाली करा, त्यानंतर मराठ्यांना कोणासमोर हात पसरवण्याची गरज नाही. आरक्षणाच्या आड येणाऱ्या नेत्याला आणि पक्षाला पाडा. आरक्षणाच्या आड येणाऱ्या छगन भुजबळांना तुडवा. कोणत्याही पक्षापेक्षा, नेत्यापेक्षा जातीला महत्त्व द्या, असंही जरांगे म्हणाले.
कुणाचा बाप आला तरी ओबीसीमधून आरक्षण घेणार आहे. गावखेड्यात मराठा आणि ओबीसीमध्ये वाद होऊ देऊ नका. पण, आपल्या लेकरांना आरक्षण देण्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे. आपल्या समाजापेक्षा कोणी मोठा नाही. मी समजासाठी रात्रंदिवस संघर्ष करत आहे. मला पैसा, पद काहीही नको. आज गावच्या गावं ओबीसी आरक्षणात निघाले नसते, असं देखील जरांगे म्हणाले.