ताज्या घडामोडीराष्ट्रिय

उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये उशिरा का होईना पण पावसाची हजेरी

दिल्लीमध्ये पावसाचा जोर वाढणार, उत्तर भारतात पूर आणि भूस्खलनाचा कहर

उत्तर भारत : यंदाच्या मान्सूनमध्ये देशात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये उशिरा का होईना पण पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या कहराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी ढगफुटी झाल्याने मोठा पूर आला तर काही ठिकाणी भूस्खलन झाल्याचेही पाहायला मिळाले आहे. केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता उत्तर भारतात विविध ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाने किमान २८ जणांचा बळी घेतला आहे. राजस्थानमध्ये जोरदार पावसामुळे भूस्खलन होऊन नागरिकांच्या घरांची पडझड झाली. दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सध्या राज्यात गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

३८ सेमी पावसाची नोंद
उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये काल (११ ऑगस्ट) रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये २८ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. मुख्यतः उत्तर आणि वायव्य भारतात हा मुसळधार पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. त्यामुळे लोकांची घरे, वाहने वाहून गेली. झाडांची मोठी पडझड झाली तसेच सगळीकडे एकच हाहाकार उडाला. राजस्थानला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. शनिवार, रविवार सलग दोन दिवस राज्यामध्ये जोरदार पाऊस कोसळत होता. या दोन दिवसांमध्ये पावसामुळे उद्भवलेल्या विविध घटनांमध्ये एकूण १६ जणांचा मृत्यू झाला. यापैकी दोन मृत्यू शनिवारी तर १४ मृत्यू रविवारी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. रविवारी, राजस्थानमधील करौली जिल्ह्यात ३८ सेमी इतक्या मुसळधार पावसाची नोंद हवामान विभागाने केली आहे.

दरम्यान, “राजस्थानमधील नागरिकांच्या सुरक्षेला आम्ही प्रथम प्राधान्य देतो”, अशी प्रतिक्रिया राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. तसेच मुख्यमंत्री कार्यालयामध्ये राज्यातील अतिवृष्टीबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व व्यवस्था तातडीने पुरवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशची स्थिती
दरम्यान, पंजाब आणि हरियाणामध्येही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हरियाणातील यमुनानगर जिल्ह्यातील सोम नदीच्या बंधाऱ्याला तडा गेल्याने अनेक गावे जलमय झाली आहेत. पंजाबमधील होशियारपुर येथे एका चारचाकी गाडीत एकूण ९ लोक प्रवास करत होते ते सर्व पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्युमुखी पडले. त्यामध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांचा समावेश होता. अनेक ठिकाणी शेतीपिके पाण्याखाली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बचाव पथकाच्या अधिकाऱ्याने राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाला (एसडीआरएफ) पाचारण करण्यात आले असल्याचे सांगितले आहे.

हिमाचल प्रदेशातही भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे तीन मुलींचा मृत्यू झाला आहे, तर एक व्यक्ती बेपत्ता आहे. भीषण भूस्खलनामुळे २८० हून अधिक रस्ते वाहतूक करण्यासाठी योग्य राहिले नाहीत, त्यामुळे दळणवळण करण्यास समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच या रस्त्यांलगतच्या ४५८ ठिकाणी वीज आणि ४८ ठिकाणच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. उत्तर प्रदेशातील जालौनमध्ये पावसामुळे घराचे छत कोसळल्याने एक महिला आणि तिच्या सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. उत्तराखंडमध्ये, भिंबली येथे मोठ्या भूस्खलनाने मंदाकिनी नदी पात्रातील पाणी इतरत्र वाहत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली. याशिवाय जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने सांगितले की अमरनाथ यात्रा परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने दरवर्षी निघणारी अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

दिल्लीकरांसाठी इशारा
दिल्लीत मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले तसेच वाहतूक कोंडीही झाली. शनिवारी रोहिणी जिल्ह्यातील सेक्टर २० येथील एका सात वर्षांच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, राजधानी दिल्लीमध्ये आज मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास करणे टाळावे, शक्य असल्यास घरातच थांबावे अशाही इशारा भारतीय हवामान विभागाने दिल्लीकरांसाठी दिला आहे. दरम्यान, कर्नाटकात पंपा सागर धरणाच्या दरवाज्यातील बिघाडामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे, त्यानंतर तिथे पूरस्थितीचा इशारा देण्यात आलेला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button