गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी गुडन्यूज, मध्य रेल्वे सोडणार 20 गणपती स्पेशल गाड्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/www.mahaenews.com-31-780x470.jpg)
Ganpati Festival 2024 : कोकण आणि गणेशोत्सव हे एक अनोखं समीकरण आहे. कोकणात गणेशोत्सवाचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. कोकणात गणेशोत्सव आणि शिमगा या दोन सणांना विशेष महत्त्व दिले जाते. गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या फार मोठी असते. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी मध्य रेल्वेकडून कोकणासाठी काही विशेष गणपती स्पेशल एक्सप्रेस सोडल्या जातात. आता या गणपती स्पेशल रेल्वे गाड्यांबद्दल एक महत्त्वाची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कोकणात आणखी 20 गणपती स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या रेल्वे गाड्यांचे आरक्षण उद्यापासून सुरु होणार आहे. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची प्रचंड गर्दी असते. ही गर्दी लक्षात घेऊन रेल्वेच्या दररोज होणाऱ्या फेऱ्यांव्यतिरिक्त रेल्वेने आणखी 20 अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वे गाड्यांचे आरक्षण 7 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
हेही वाचा – इराण-इस्रायल यांच्यातील तणावामुळे संपूर्ण जग तिसऱ्या महायुद्धच्या छायेत!
या अतिरिक्त फेऱ्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस- रत्नागिरी द्वि- साप्ताहिक विशेषच्या 8 फेऱ्यांचा समावेश आहे. ही 01031 विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 6, 7, 13, 14 सप्टेंबर या दिवशी 8 वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी 4:50 वाजता पोहोचेल.
त्याचप्रमाणे 01032 ही विशेष गाडी रत्नागिरी येथून 7, 8, 14, 15 सप्टेंबर या दिवशी सकाळी 8:40 वाजता सुटेल. तर लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी 5:15 वाजता पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल.
तर दुसरीकडे राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण सुरु झाले आहे. गणेशोत्सवादरम्यान कोकणासाठी मुंबई सेंट्रल, परळ, पनवेल आणि कुर्ला नेहरूनगर या ठिकाणाहून २ आणि ३ सप्टेंबरपासून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. तर कणकवली, राजापूर, विजयदुर्ग, दापोली, भालावली, देवगडदरम्यान जादा एसटी फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.