‘माझ्या घरावर ईडी कधीही छापा टाकू शकते’; राहुल गांधींचा खळबळजनक दावा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Rahul-Gandhi-780x470.jpg)
नवी दिल्ली | लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण केलं ज्यात त्यांनी महाभारतातल्या अभिमन्यूचा संदर्भ दिला आणि चक्रव्यूह कसा रचला जातो आहे ते सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, मुकेश अंबानी आणि गौतम अदाणी या सहा जणांनी हा आधुनिक चक्रव्यूह रचल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. आता राहुल गांधींनी त्यांच्यावर ईडीची छापेमारी होणार आहे अशी पोस्ट केली आहे.
दोघांपैकी एकाला माझं चक्रव्यूह संदर्भ देऊन केलेलं भाषण आवडलं नाही. ईडीतल्या आतल्या गटाने मला सांगितलं की तुमच्यावर आता छापेमारी केली जाणार आहे. त्यासंदर्भात योजना तयार केली जात आहे. मी तयार आहे, ईडीची वाट पाहतो आहे. चहा आणि बिस्किटं माझ्याकडून, अशी सूचक पोस्ट राहुल गांधींनी केली आहे.
हेही वाचा – १०० रुपयात पाहा प्रभासचा ‘कल्की २८९८ एडी’, जाणून घ्या नेमका कसा?
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
२९ जुलै रोजी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलत असताना राहुल गांधींनी चक्रव्युहाचा संदर्भ दिला होता. एवढंच नाही तर सध्याचं चक्रव्यूह हे कमळाच्या आकाराचं आहे, ते चक्रव्यूहही त्याच आकाराचं होतं. आजच्या चक्रव्यूहात सहा लोक आहेत. त्यावेळी सहा लोक होते. तसेच आजही आहे. त्यात मोदी, शाह, संघ प्रमुख मोहन भागवत, डोवाल, अदानी आणि अंबानी आहेत. हे सर्व काही कंट्रोल करत आहेत, असं राहुल गांधी म्हणाले होते.