विशाळगडावर धर्माचा नाही, अतिक्रमणाचा विषय
विशाळगडावरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून वाद पेटला
विशाळगड : विशाळगडावरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून सध्या वाद पेटला आहे. असं असतानाच संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. तेव्हा बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना थेट सवाल केला आहे. जातीच वळण याला देऊ नये अशी सर्व नेत्यांना विनंती मी प्रामाणिक पणे काम करत आहे, गड अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे हीच अपेक्षा आहे. जे विशाळगडावर केलं ते राज्यातील इतर किल्ल्यावर देखील करावं ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे. हसन मुश्रीफ माझ्यावर टीका करत आहेत तुम्ही गडावर कधी गेला आहात का किल्यांसाठी निधी दिला आहे का?, असा थेट सवाल संभाजीराजे यांनी केला आहे.
विशाळगडावर 158 अतिक्रमणं- संभाजीराजे
राज्यातील सर्व लोकांना कल्पना आहे की गडांवर मी काम करत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेकांची मागणी होती की मी विशाळगडावर काम करावं. दीड वर्षपूर्वी आम्ही गडाला भेट दिली होती. गलिच्छ प्रमाणे तिथं अतिक्रमण झालं होतं. तिथल्या स्थानिक लोकांनी देखील मान्य केलं होतं की अतिक्रमण झालं आहे. गडावर 158 अतिक्रमणं झाली होती. तत्कालीन जिल्हा अधिकर्यांनी सांगितलं होतं की अतिक्रमण हटवा. पण राजकीय लोकांनी हस्तक्षेप केला आणि स्टे आला होता. लोकप्रतिनिधींनी दबाव टाकला होता, असं संभाजीराजे म्हणाले.
“हा धर्माचा नव्हे तर अतिक्रमणचा विषय”
विशाळगडावर धर्मचा नाही तर अतिक्रमणचा विषय होता. या गडाचा इतिहास मोठा आहे. एक राजधानी देखील होती. तिथं कत्तलखाना आणि अनेक नको ती दुकाने होती. अतिशय गलिच्छ अतिक्रमण झालं होतं. पार्ट्या होत होत्या. म्हणून मी आक्रमक झालो होतो. मी आधी सांगितलं होतं की काम करा नाहीतर गडावर जाईल म्हणून मी आक्रमक झाला होतो. पालकमंत्री, तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील काही बोलले नाहीत. मग मी आक्रमक झालो यात काय चूक आहे?, असा सवालही संभाजीराजेंनी केलाय.
आता माझ्यावर जातीवादाचे आरोप केले जात आहेत. अतिक्रमण हटवलं, याचा मला आनंद आहे. हे आधीच व्हायला पाहिजे होतं. आता सगळे अतिक्रमण हटवत आहेत. काल एका दिवशी 70 अतिक्रमण हटवले आहेत. मुख्यमंत्री आणि शिव भक्तचे आभार व्यक्त करतो, असंही यावेळी संभाजीराजेंनी म्हटलंय.