शासनदरबारी वाटाघाटी होऊन वीज कर्मचाऱ्यांची अखेर पगारवाढ जाहीर
महाराष्ट्र राज्य वीज कामगार,अभियंते,अधिकारी संयुक्त कृती समितीच्या प्रयत्नांना यश
मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील विभाजित निर्मिती,पारेषण व वितरण विज कंपन्या मधील ६८,०४५ हजार कर्मचारी, अभियंते, अधिकारी व सहाय्यक प्रवर्गातील कामगारांच्या पगारवाढीचा करार दिनांक १.४.२०२३ पासून प्रलंबित होता. मात्र महाराष्ट्र राज्य वीज कामगार,अभियंते, अधिकारी संयुक्त कृती समितीच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर शासनदरबारी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व ऊर्जामंत्री यांच्या पातळीवर याबाबत वाटाघाटी होऊन वीज कर्मचाऱ्यांची पगारवाढ जाहीर करण्यात आली. यामुळे महाराष्ट्र राज्य वीज कामगार, अभियंते, अधिकारी यांच्यावतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
वीज कर्मचाऱ्यांना मूळ वेतनामध्ये १५ टक्के व भत्त्यामध्ये १०० टक्के वाढ देण्याबाबत यापूर्वी सांगितले होते. मात्र यामुळे मुळवेतन व भत्ते वाढ केल्यानंतर रु. १४७० कोटी आर्थिक भार कंपन्यावर येईल, हे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र कामगार संघटनांनी आपण केलेली वाढ असमाधानकारक असल्याने. कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. कृती समिती कामगार संघटनांच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली. दरम्यानच्या काळात लोकसभेची आचारसंहिता सुरू झाल्यामुळे गेले ४ महिने पगारवाढीच्या वाटाघाटी बंद होत्या.
पगारवाढीचा करार तात्काळ करावा याकरीता महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी,अभियंते,अधिकारी संयुक्त कृती समितीच्यावतीने क्रमबद्ध आंदोलनाची नोटीस प्रशासनास दिली. महाराष्ट्रभर २४ जून व २८ जून व दि.४ जुलैला प्रचंड द्वारसभा झाल्या. दिनांक ९ जुलै पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय कृती समितीने घेतला. या संपाच्या पार्श्वभूमीवर दि. ७ जुलै २०२४ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व ऊर्जामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व अप्पर मुख्य सचिव (ऊर्जा), मा. लोकेश चंद्र (महावितरण), मा. संजय कुमार (महापारेषण) व डॉक्टर पी. अनबलगम (महानिर्मिती) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तिन्ही वीज कंपन्यांचे, मा.संचालक (मासं) व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये अंतिम वाटाघाटी ह्या मा.उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्या पातळीवर झाल्या. कामगार संघटनांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मा.देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांनी अखेर पगारवाढ जाहिर केली.
शासन दरबारी झालेल्या वाटाघाटीतील महत्वपूर्ण निर्णय…
१) कर्मचारी,अभियंते व अधिकारी यांच्या मूळ वेतनामध्ये १९ % वाढ करण्यात येईल.
२) कर्मचारी, अभियंते व अधिकारी यांना सर्व अलाउन्सेस मध्ये २५ टक्के वाढ मान्य करण्यात आली.
३) ३ वर्षाच्या कंत्राटी पद्धतीवर नेमलेल्या सहाय्यक कर्मचाऱ्यांना रु.५००० वाढ करण्यात आली.
४) लाईनवर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना अतिरिक्त रु.१००० देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
५) प्रलंबित विषयवार लवकरच अनामलिज कमिटी कालबद्ध कार्यक्रम ठरवून निर्णय घेणार.
मा.ऊर्जामंत्री यांच्या समवेत झालेल्या बैठकी मध्ये खालील सहा कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
समाधानकारक पगारवाढ झाल्याबदल महाराष्ट्रात उद्या सोमवार दि.०८.०७.२०२४ रोजी व्दारसभा आयोजित करण्यात यावे
१) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन कॉम्रेड मोहन शर्मा (अध्यक्ष),कॉम्रेड कृष्णा भोयर (सरचिटणीस)
२) महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघ श्री.अरुण पिवळ (सरचिटणीस), प्रशांत भांबुर्डेकर उपमहामंत्री. ३) सबर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे श्री.केदार रेळेकर (अध्यक्ष),श्री.सतोष खूमकर(सरचिटणीस). ४) विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे श्री.रवींद्र बारई(अध्यक्ष),श्री.आर.टी.देवकांत(सरचिटणीस) ५) महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस (इंटक)चे दत्तात्रय गुट्टे ( मुख्य महासचिव), सुरेश देवकर (सरचिटणीस).
६) महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनचे संजय मोरे (कार्याध्यक्ष), प्रेमानंद मौर्य (सरचिटणीस)





