सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीचा प्रचार समाप्त; 57 जागांसाठी 1 जूनला मतदान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/mahaenews-66-780x470.jpg)
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीचा प्रचार गुरूवारी सायंकाळी समाप्त झाला. त्यामुळे राजकीय महासंग्रामासाठीच्या मॅरेथॉन प्रचाराला पूर्णविराम मिळाला. आता अखेरच्या टप्प्यासाठी शनिवारी (दि.१ जून) देशातील ७ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील मिळून ५७ जागांसाठी मतदान होईल. त्या जागांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असलेल्या वाराणसीचाही समावेश आहे. अंतिम टप्प्यात एकूण ९०४ उमेदवारांचे भवितव्य ठरेल.
अखेरच्या टप्प्यात पंजाबमधील सर्व १३ जागांसाठी तसेच चंदिगढमधील एकमेव जागेसाठी मतदान होईल. त्या टप्प्यात उत्तरप्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील ९, बिहारमधील ८ आणि ओडिशातील ६ जागांसाठी मतदार त्यांचा कौल देतील. त्याशिवाय, हिमाचल प्रदेशातील सर्व ४ जागांसाठी आणि झारखंडमधील ३ जागांसाठीही मतदान होणार आहे. त्या मतदानामुळे मतदारांच्या कौलाची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष ४ जूनला जाहीर होणाऱ्या निकालाकडे लागेल.
हेही वाचा – ‘राहुल गांधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, त्यांना स्वप्न पाहूद्या’; फडणवीसांचा खोचक टोला
निवडणूक आयोगाने १६ मार्चला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यामुळे प्रचारासाठी ७५ दिवसांचा प्रदीर्घ कालावधी उपलब्ध झाला. साहजिकच, प्रमुख राजकीय पक्षांना मॅरेथॉन प्रचार मोहिमा राबवण्याची संधी मिळाली. सर्वच पक्षांच्या स्टार प्रचारकांनी झंझावाती दौरे करत प्रचाराचा धुरळा उडवून दिला. यावेळच्या निवडणुकीला भाजपच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ एनडीए विरूद्ध विरोधकांची इंडिया आघाडी अशा लढतीचे स्वरूप प्राप्त झाले.
भाजप आणि सत्ताधाऱ्यांच्या प्रचाराची धुरा मोदींनी सांभाळली. त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, इतर केंद्रीय मंत्री, पक्षाच्या आणि मित्रपक्षांच्या नेत्यांनी मोलाची साथ दिली. इंडियाचा महत्वाचा घटक असणाऱ्या कॉंग्रेसच्या प्रचाराची सुत्रे पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल-प्रियंका गांधी या बंधू-भगिनींनी सांभाळली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राजदचे नेते तेजस्वी यादव यांनीही प्रचाराची रंगत वाढवली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इतर प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनीही धमाकेदार प्रचार केला.