आमच्या प्रचारावर लक्ष ठेवण्यापेक्षा, आपण १५ वर्षे काय केलं ते सांगावं
खा. डॉ. अमोल कोल्हे यांचे आढळराव पाटील यांना सडेतोड उत्तर
राजगुरूनगरः शिरूर लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. यामध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना निष्ठा, संसदरत्न, चांगली भाषणे याशिवाय डॉ. कोल्हे यांच्याकडे प्रचारात मुद्दे नाही असे सांगितले. त्यावर माध्यमांशी बोलताना डॉ. कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.
माध्यमांशी बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले की, मला हे तीनही मुद्दे ठाऊक नव्हते हे आढळराव पाटील यांनी सांगितले. त्यामुळे त्यांचे धन्यवाद, तीन टर्म खासदार राहिलेल्या वयस्कर नेत्यांनी आपण १५ वर्षे काय केलं ते सांगावं, आपण पुढे काय करणार आहोत ते सांगावं, समोरच्यावर टीका म्हणजे प्रचार नाही, प्रचारात काय मुद्दे आहेत, काय नाहीत इतक्या बारकाईने आमच्या प्रचाराकडे लक्ष ठेवतात त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो.
डॉ. कोल्हे पुढे म्हणाले निष्ठा हा शब्द उच्चारताना आढळराव यांना त्रास होत असेल, म्हणून त्यांना मुद्दा भरकटविण्यासाठी हे असं बोलावं लागत आहे. १५ वर्षात केलेली कामे आणि पाच वर्षात केलेली कामे ही लोकांच्या समोर आहेत. त्यामुळे जनता ठरवतील कोण उजवा आहे. त्यामुळे उमेदवारांनी एकमेकांचे मूल्यमापन करण्यापेक्षा जनतेला ठरवू द्या.
गेल्या दोन दिवसांपूर्वी खेड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याच्या बातम्या विरोधकांनी पेरल्या होत्या. कोणा एकाला विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारीचा शब्द दिल्याच्या कथित चर्चा सुरू होत्या त्यावर बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, पाण्यात म्हैस आणि बाजारात मोल अशी गोष्ट नको, सद्या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे, माझ्यासोबत हिरामण सातकर अतुल देशमुख, बाबाजी काळे, अशोक खंडेभारड, रामदास धनवटे, विजय डोळस हे सर्व महाविकास आघाडीतील नेते एकजुटीने लोकसभेचा प्रचार करत आहेत, त्यामुळे विरोधकांना ग्राउंडवर प्रतिसाद मिळत नाही. महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकायचा म्हणून असे प्रकार सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी खेड विधानसभा मतदारसंघातील दौरा रद्द होण्याचे कारण म्हणजे मला इतर मतदारसंघात देखील पक्षाच्या संघटनेसाठी काम करावं लागतं. या गोष्टीची कदाचित विरोधकांना सवय नाही. त्यांना गैरसमज पसरविण्यात आनंद मिळतो. महायुती एकसंध आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभेचे उमेदवार वरिष्ठ नेते ठरवतील. त्यामुळे आत्ताच मिठाचा खडा टाकून असुरी आनंद घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा हा प्रयत्न कधीही सफल होणार नाही.
दरम्यान यावेळी खासदार डॉ. कोल्हे यांनी कांद्याच्या शेतात जाऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी महिला मजुरांनी डॉ. कोल्हे यांना कांदे भेट दिले त्यावर डॉ. कोल्हे म्हणाले की ही भेट नसून या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वेदना आहेत. माता भगिनींची तळमळ आहे, सरकारला काहीही याचा फरक पडत नाही. महाराष्ट्रात साडेतीन जिल्हे आहेत जिथे सर्वाधिक कांदा पिकतो. महायुतीतील नेते वयक्तिक टीका करण्यात व्यस्त आहेत पण शेतकऱ्यांनाच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही.
याशिवाय दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांचा अपेक्ष भंग झाला आहे पाणी आणि चारा टंचाई यावर कोणी बोलत नाही. राजकीय मेळावे घेऊन याला पाडू त्याला पाडू अशी भाषा केली जाते परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही.