अरविंद केजरीवाल यांना अटक, शरद पवारांचा भाजपावर हल्लाबोल!
मुंबई | दिल्लीतल्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. केजरीवालांच्या अटकेनंतर देशभरातील सर्व विरोधी पक्ष त्यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार यांनीही या अटकेचा निषेध नोंदवला आहे. तसेच त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.
शरद पवार म्हणाले की, मोदी सरकारने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरूंगात डांबलं आहे. त्यापाठोपाठ आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. दिल्ली सरकारच्या मद्य धोरणावरून ही अटक करण्यात आली आहे. प्रत्येक राज्यात असं धोरण असतं. राज्यांच्या मंत्रिमंडळाला हे धोरण बनवण्याचा अधिकार असतो. हे धोरण बनवणारी एक अधिकृत यंत्रणा असते. कदाचित त्यात काही चुकलं असेल. परंतु, त्यासाठी भाजपाने लोकांमध्ये जाऊन हा प्रश्न उपस्थित करावा, यात काही कायदेशीर बाबी असतील तर न्यायालयात जावं. त्यांनी या प्रकरणी यापूर्वीच दोन-तीन जणांना अटक केली आहे. आता राज्याच्या प्रमुखाला अटक करण्यात आली आहे. राज्याचं धोरण ठरवलं म्हणून अशा प्रकारे अटक करणं चुकीचं आहे.
हेही वाचा – ‘अमरावतीची जागा भाजपाच लढवणार’; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यामुळे या घटनेचा परिणाम निवडणुकीवर होईल आणि आगामी निवडणुकीत केजरीवाल यांचे उमेदवार सर्व जागांवर जिंकतील. त्यांचे १०० उमेदवार निवडून येतील. दिल्लीच्या मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाला केवळ दोन जागा जिंकता आल्या होत्या. यावेळी त्यांना एकही जागा मिळणार नाही. लोक पुन्हा एकदा केजरीवाल यांच्या बाजूने कौल देतील. तसेच ज्यांनी या सर्व कारवाया केल्या त्यांच्या थोबाडीत लगावतील, असं शरद पवार म्हणाले.
भाजपा देशभर त्यांची दहशत निर्माण करत आहे. यापूर्वी कोणत्याही सत्ताधाऱ्याने असं केलं नव्हतं. लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु, आम्ही पूर्ण ताकदीने केजरीवाल यांच्या पाठिशी उभे राहणार. मी इंडिया आघाडीचा घटक म्हणून सांगतोय की, या परिस्थितीत आम्ही केजरीवाल आणि आपच्या पाठिशी उभे आहोत, असंही शरद पवार म्हणाले.