भारताचा श्रीलंकेवर ३०२ धावांनी विजय, सेमीफायनलमध्ये थाटात प्रवेश
INDvsSL : एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा ३३ वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात काल खेळला गेला. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा तब्बल ३०२ धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये थाटात प्रवेश केला.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत आठ गडी गमावून ३५८ धावा केल्या. भारतीय संघाचा फलंदाज शुबमन गिलने सर्वाधिक ९२ धावांची खेळी खेळली. तर विराट कोहलीने ८८ आणि श्रेयस अय्यरने ८२ धावा केल्या. तर श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने ५ बळी घेतले.
हेही वाचा – सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला, सरकारला 2 जानेवारीची डेडलाईन
प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ केवळ ५५ धावा करू शकला. कसून राजिताने सर्वाधिक १४ धावा केल्या. श्रीलंकेचे ५ फलंदाज शून्य धावांवर बाद झाले. त्याचवेळी आठ फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताकडून मोहम्मद शमीने ५ विकेट घेतल्या. तो या सामन्याचा सामनावीर ठरला. मोहम्मद सिराजने तीन तर जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.
दरम्यान, भारताने सलग सातवा सामना जिंकून १४ गुणांसह उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. उपांत्य फेरी गाठणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे.