‘माझी निवडणुकीची हौस भागली’; उदयनराजेंचं विधान चर्चेत
पुणे : २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र भाजपाने त्यांना राज्यसभेवर संधी दिली होती. अशातच उदयनराजे यांनी एक सूचक विधान केलं आहे.
उदयनराजे म्हणाले, माझी निवडणुकीची हौस भागली आहे. बघता बघता पन्नाशी कधी ओलांडली समजले नाही. शाळा आणि कॉलेज कधी संपलं कळालं सुद्धा नाही. आता कुठेतरी प्रत्येकानं थांबलं पाहिजे. सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय असते. तसे, राजकीय नेत्यांनाही लागू केलं पाहिजे. नाहीतर प्रत्येक राजकीय नेता लोकांचा आग्रह असल्याने उभं राहिलो, असं सांगतात.
हेही वाचा – IND vs PAK : भारत-पाकिस्तान संघात आज रंगणार विश्वचषकातील सर्वात मोठा सामना
शरद पवार यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं. कारण, मुख्यमंत्री आणि केंद्रातही अनेक वर्षे ते मंत्री राहिले आहेत. अनेकांना वाटतं शरद पवारांकडून मार्गदर्शन घ्यावं. त्यामुळे शरद पवारांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणं, मला योग्य वाटतं, असंही उदयनराजे म्हणाले.