‘भुजबळांना मंत्रीपद हवं होतं, त्यासाठी ते भाजपसोबत गेले’; संजय राऊत यांचा हल्लाबोल!
![Sanjay Raut said that Bhujbal wanted a ministerial position, for that he went with BJP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Sanjay-Raut--780x470.jpg)
मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांनी एका मुलाखतीत शरद पवार, राष्ट्रवादी पक्षाबाबत मोठे दावे केले आहेत. तसंच महाविकास आघाडीतील अनेक मुद्द्यावर भाष्य केलं आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. छगन भुजबळांना मंत्रीपद हवं होतं, म्हणून ते भाजपसोबत गेले, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, छगन भुजबळ खोटं बोलत आहेत. महविकास आघाडी ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षाच्या नेत्यांनी केलेली आघाडी आहे. महाविकास आघाडीची चर्चा सुरू असताना छगन भुजबळ नुकतेच तुरुंगातून सुटून बाहेर आले होते. भुजबळ आता काय म्हणत आहेत याला काहीही महत्व नाही. त्यांना मंत्रिपद हवं होतं. ईडीपासून संरक्षण हवं होतं. म्हणून ते भाजपसोबत गेले आहेत. मात्र फाईल कधीही बंद होत नाही.
हेही वाचा – National Cinema Day : आज फक्त ९९ रूपयात पाहता येणार कोणताही सिनेमा
नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सापडलं आहे. यावरून संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राची काळजी असेल तर नाशिकमधील ड्रग्स प्रकरणाची चौकशी करतील. ससूनमध्ये इतके दिवस तो व्यक्ती कसा राहिला. तो जेलमधून कसा बाहेर आला? त्याला कुठल्या भाजपच्या माणसाने मदत केली हे सगळ रेकॉर्डवर आलेलं आहे. सर्वात आधी दादा भुसे यांचा राजीनामा घेतला पाहिजे ते पुराव्यां संदर्भात छेडछाड करत आहेत, असं म्हणत दादा भुसे यांच्यावरही संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.