‘मराठा आंदोलनात उद्रेक करणारे संभाजी भिडेंचे कार्यकर्ते’; मराठा क्रांती समन्वयकांचा गंभीर आरोप
मुंबई : जालन्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी लाठीमार केला. यानंतर याचे पडसाद संपुर्ण राज्यभर उमटत आहेत. दरम्यान, यावरून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय लाखे पाटील यांनी या हिंसाचारावरून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संभाजी भिडे यांच्या संघटनेवर गंभीर आरोप केले आहेत.
संजय लाखे पाटील म्हणाले, आजपर्यंत मराठा समाजानं शांततेत मोर्चे काढले. कधीच धुडगूस घातला नाही. मात्र मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते आंदोलनात घुसले आणि त्यांनी उद्रेक केला. त्याचबरोबर लाठीचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले, याची चौकशी झाली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा – ५ सप्टेंबरलाच शिक्षक दिन का साजरा केला जातो? वाचा संपूर्ण इतिहास!
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेतले पाहिजे आणि गुन्हे मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात हजारोंच्या संख्येनं मराठा आंदोलक उपोषणाला बसतील, असा इशाराही संजय लाखे पाटील यांनी दिला आहे.