मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा; म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत २ दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा..
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. राज्य सरकारने जरांगे-पाटील यांच्याकडे एका महिन्याचा कालावधी देण्याची विनंती केली आहे. पण जरांगे-पाटील यांनी हा प्रस्ताव फेटाळत राज्य सरकारला दोन दिवसांत निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे.
मनोज जरांगे-पाटील म्हणाले, सरकारने प्रतिसाद दिल्यामुळे पाणी पिण्यास सुरूवात केली. पण, अन्नत्याग अद्यापही चालू आहे. सरकारने २ दिवसांत निर्णय घ्यावा. अन्यथा पूर्ण पाणीत्यागही करणार आहे. तसेच, लोकशाही मार्गाने टोकाचं आंदोलन करत आरक्षण मिळवणार. मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचं सरकारला कळवलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. ते मिळाल्याशिवाय मी थांबणार नाही.
हेही वाचा – जालन्यातील आंदोलकांच्या केसाला जरी धक्का लागला तरी संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल
मी मराठा आरक्षणासाठी शांततेच्या मार्गानं उपोषण करत होतो. पण, आमच्यावर पोलिसांकडून लाठीहल्ले करण्यात आले. लहान मुलं, महिला, वयोवृद्ध यांना बेदम मारहाण झाली. छर्रे आणि गोळीबार करण्यात आला. आता आंदोलनात माघार नाही. मेलो तरी चालेल, पण मी आरक्षण मिळेपर्यंत माझे उपोषण सोडणार नाही. दोन दिवसांत माझ्या मराठवाड्यातील बांधवाला आरक्षण द्या आणि टप्याटप्याने महाराष्ट्राला तीन महिन्यांत आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे.