‘जे खोके-खोके ओरडत आहेत ना त्यांच्याकडे कंटेनर’; राज ठाकरेंचा महाविकास आघाडीला टोला
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी गद्दार, ५० खोके एकदम ओके असा उल्लेख केला जात होता. दरम्यान, यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवर खोचक टीका केली आहे. जे खोके-खोके ओरडत आहेत ना त्यांच्याकडे कंटेनर आहेत, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. ते पनवेलमधल्या सभेत बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले की, जे खोके खोके ओरडत त्यांच्याकडे कंटेनर आहेत असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. प्रत्येक वेळी यायचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचं आणि तुम्हाला इमोशनल करतायचं. आज हे जे ओरडत आहेत ना खोके खोके त्यांच्याकडे कंटेनर्स आहेत. कोविड पण त्यांनी सोडला नाही. हेच तुमच्याकडे येणार निवडणुकीच्या तोंडावर आणि कुणालातरी दाखवणार. प्रत्येक वेळी यायचं बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि तुम्हाला इमोशनल करायचं हेच सुरु आहे.
अजित पवार म्हणे महाराष्ट्राचा विकास करायला सत्तेत गेलो. काय बोलताय ? पंतप्रधानांनी ७०,००० कोटींच्या घोटाळ्याची आठवण करून दिली आणि हे टुणकन निघाले. बहुधा भुजबळांनी सांगितलं असेल जेलमध्ये काय काय असतं. ते म्हणाले असतील जेलपेक्षा भाजपकडे गेलेलं बरं, असं राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा – ‘दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा भाजने पक्ष उभारायला शिकावे’; राज ठाकरेंचा टोला
भारतीय जनता पक्षाने मध्यतंरी सल्ला दिला की मनसेने रस्ते आणि टोल बांधायला पण शिका. मी त्यांना सांगतो की त्या पेक्षा दुसऱ्यांच्या आमदारांना निवडून फोडून आणायच्या ऐवजी स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका. नको ते सल्ले आम्हाला देऊ नका, असा टोला राज ठाकरेंनी भाजपला लगावला.
३७० कलम रद्द झाल्यावर काय सांगितलं की कोणीही आता काश्मिरात जमीन घेऊ शकता. मला आनंद आहे की ३७० रद्द झाला. मी तर अभिनंदन पण केलं होतं. पण तुम्ही काश्मीर असो, हिमाचल असो की नॉर्थ इस्टची राज्य तिथे कोणत्याही बाहेरच्या माणसाना जमीन घेता येणार नाही. मग हा नियम महाराष्ट्रात का नाही ? बरं मला सांगा ३७० झाल्यावर तुम्ही म्हणालात की काश्मीरमध्ये कोणीही जमीन घेऊ शकतो मग आत्तापर्यंत अदानी किंवा अंबानी समूहाने जमीन का नाही घेतली? असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.
२०२४ ला मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल असं आता सरकार सांगतंय. चांगलंच आहे, हे व्हायलाच हवं. पण पुढे काय? मुंबई-पुणे रस्ता झाला, आणि पुणे पसरत गेलं. घडलं काय तर पुण्याची पार वाट लागली. पुण्यात मराठी माणूस हा आक्रसत चालला आहे. हेच कोकणात होणार आहे. गोव्यात २०२३ चा कायदा आहे की तुम्हाला सहज शेतजमीन घेता येणार नाही. आणि जर घेतली तर तिकडे शेतीच करावी लागली, तिथे इतर उद्योग, हॉटेलं उभारता येणार नाही. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की गोव्याचा आम्ही गुरुग्राम होऊ देणार नाही, थोडक्यात उत्तर भारतीयांना जमिनी घेऊन गोव्याची वाट लावू देणार नाही. आणि हे बोलणारा कोण तर भाजपचा मुख्यमंत्री, असंही राज ठाकरे म्हणाले.