‘तुमच्यासाठी देशापेक्षा पक्ष मोठा’; अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल!
नवी दिल्ली : गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये अंतर्गत असंतोष व हिंसाचाराच्या अनेक घटना घडताना दिसत आहेत. यावर पंतप्रधान मोदींनी अद्याप संसदेत भूमिका न मांडल्यामुळे विरोधकांनी त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव आणला आहे. यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी मोदींवर आरोप व टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या तीन दिवसांपासून अनेक सदस्यांनी आपले विचार मांडले. सगळ्यांचीच भूमिका माझ्यापर्यंत पोहोचली आहे. मी स्वत: काही भाषणं ऐकलीही आहेत. देशाच्या जनतेनं आमच्या सरकारबाबत वारंवार विश्वास दर्शवला आहे. मी आज देशाच्या कोट्यवधी नागरिकांचे आभार व्यक्त करतो. असं म्हणतात, इश्वर फार दयाळू आहे. देवाची मर्जी असते की तो कुणा ना कुणाच्या माध्यमातून आपल्या इच्छांची पूर्ती करतो. मी हा देवाचा आशीर्वाद मानतो की देवानं विरोधी पक्षांना सुचवलं आणि ते अविश्वास प्रस्ताव घेऊन आले.
२०१८मध्येही हा इश्वराचाच आदेश होता की विरोधी पक्ष अविश्वास प्रस्ताव घेऊन आले होते. तेव्हाही मी म्हटलं होतं की अविश्वास प्रस्ताव आमच्या सरकारची बहुमत चाचणी नाही, तर विरोधी पक्षांचीच बहुमत चाचणी आहे. झालंही तेच. जेव्हा मतदान झालं, विरोधी पक्षांकडे जेवढी मतं होती, तेवढीही ते जमा करू शकले नव्हते. विरोधी पक्षांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ ठरतो. आज मी बघतोय की तुम्ही ठरवलंच आहे की एनडीए व भाजपा २०२४ च्या निवडणुकीत जुने सर्व विक्रम तोडून मोठा विजय मिळवतील, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
हेही वाचा – ICC कडून क्रिकेट चाहत्यांना आनंदाची बातमी, ‘या’ तारखेपासून मिळणार तिकेटे
विरोधी पक्षांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ ठरतो. आज मी बघतोय की तुम्ही ठरवलंच आहे की एनडीए व भाजपा २०२४ च्या निवडणुकीत जुने सर्व विक्रम तोडून मोठा विजय मिळवतील. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांनी कामकाजाच सहभाग घेतला असता तर चांगलं झालं असतं. गेल्या काही दिवसांत या सभागृहानं अनेक महत्त्वाची विधेयकं पारित केली. त्यावर सविस्तर चर्चा आवश्यक होती. पण राजकारण विरोधकांसाठी प्राधान्याची बाब होती. त्या विधेयकांमध्ये विरोधकांना रस नव्हता, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
देशाच्या जनतेनं ज्यासाठी त्यांना इथे पाठवलंय, त्या जनतेचाही विश्वासघात करण्यात आला. काही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हे दाखवून दिलंय की देशापेक्षा त्यांना पक्ष मोठा आहे. विरोधकांना देशापेक्षा स्वत:च्या राजकीय भवितव्याची चिंता आहे. अविश्वास प्रस्तावावरही तुम्ही कसली चर्चा केली. तुमचे दरबारीही फार दु:खी आहेत. ही अवस्था आहे तुमची. फिल्डिंग विरोधकांनी लावली, पण चौकार-षटकार सत्ताधारी बाकांवरून लागले. विरोधी पक्ष अविश्वास ठरावावर नो बॉल करत पुढे चालत राहिला. इथून सेंच्युरी होत होती, तिथून नो बॉल होत होते, असं नरेंद्र मोदी म्हणाले.