राष्ट्रवादीला करप्ट पार्टी म्हणता मग सत्तेत का घेतलं? सुप्रिया सुळेंचा लोकसभेत भाजपवर हल्लाबोल
मुंबई : संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दिल्ली सेवा शर्ती विधेयकावर बोलताना केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला करप्ट पार्टी म्हणता मग राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात सत्तेत कशी काय, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी भाजपला केला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन भाजपने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते. पण. केंद्रात सरकार आल्यानंतर भाजप या घोषणेची पूर्तता करू शकलं नाही. त्यामुळे भाजप सरकारने हा जुमला होता असे मान्य करावे आणि माफी मागावी. तसेच, गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं जम्मू-काश्मीरमध्ये एक वर्षात निवडणुका घेऊ, चार वर्षे झाले निवडणुका झाल्या नाहीत.
हेही वाचा – NCC ट्रेनिंगच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, व्हिडीओ व्हायरल
भाजपाकडून कायमच आमच्यावर घराणेशाहीचा मुद्दा घेऊन टीका केली जाते. हे मला मान्य आहे मी स्वतः घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहेच. मी प्रतिभा शरद पवार यांची मुलगी आहे याचा मला अभिमान आहे. पण भाजपा खासदार, आमदारांची पहिली, दुसरी आणि तिसरी पिढी राजकारणात झाली ते चालतं. मात्र आम्ही केलं तर ती घराणेशाही असते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आमच्या मतदार संघात येऊन भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी एनसीपी म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी, असे म्हंटले होते. मग, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात सत्तेत कशी काय, याचे मला उत्तर पाहिजे आहे. आम्ही तुमच्या बरोबर आलो तर चांगले आणि विरोधात गेलो तर आम्ही वाईट असं नसतं. ही लोकशाही आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.