पंकजा मुंडेंनंतर ‘या’ नेत्याला बीआरएसकडून मुख्यमंत्रिपदाची ऑफर
मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रात विस्तर करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपुर्वी बीआरएसपक्षाकडून भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली होती. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी शंघनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बीआरएसने पक्षात येण्याची तसेच मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. याबाबतची माहिती स्वत: राजू शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, राज्यातील अनेक शेतकरी नेत्यांना बीआरएसकडून ऑफर मिळाली आहे. यामध्ये विजय जावंदे असतील, वामनराव चटप असतील यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांशी बीआरएसने संपर्क साधला आहे. त्यांनाही तशी ऑफर दिली होती. मलाही दिली होती.
हेही वाचा – ‘वांद्रे-वर्सोवा सी लिंक’ला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मला त्यांच्याकडून सांगण्यात आलं की, आम्ही भारत राष्ट्र समितीकडून महाराष्ट्रात आगामी निवडणुका लढणार आहोत. तुम्ही जर आमच्या पक्षात आलात तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून आम्ही तुमचा चेहरा पुढे करू. राज्यात शेतकऱ्यांचं राज्य असेल आणि त्यासाठी पक्षाचा चेहरा म्हणून तुम्ही असाल. तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा. त्याचबरोबर आम्ही आमच्या पक्षाच्या केंद्रीय कोअर कमिटीत सदस्य म्हणून तुमचा समावेश करू, असा प्रस्ताव त्यांनी दिला होता. परंतु त्यांच्या प्रस्तावास मी नम्रपणे नकार दिला आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.
मी त्यांना सांगितले की, कुठल्याही पक्षात जायचा विचार मी आतापर्यंत कधीच केला नाही. कधी कुठल्या पक्षात गेलो नाही. आतापर्यंत आम्ही आघाड्या केल्या आहेत. परंतु कुठल्या पक्षात जायचा विचारही कधी माझ्या मनात आला नाही. राजकारणात मला जर अशा प्रकारे करीअर करून स्थिर व्हायचं असतं तर २० वर्षांपूर्वी जेव्हा निवडून आलो तेव्हाच मी तसा विचार केला असता. त्यामुळे त्यांच्या ऑफरला मी नम्रपणे नकार दिला, असंही राजू शेट्टी म्हणाले.